अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 16 जून : हवामान बदलताच आणि उकाड्यात पावसाची चाहूल लागताच सापही बिळातून बाहेर यायला सुरुवात झाली आहे. अगदी घराच्या सोफ्यात, कधी फ्रिजमध्ये, तर कधी किचनमध्ये साप आढळल्याच्या घटना वाचायला मिळतात. आता चक्क बुटांच्या कपाटात साप लपून बसल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्याच्या आझाद नगरातील बरमपूरमध्ये नीरज ठाकूर यांच्या घरात रात्री 11.30 वाजता कोब्रा दिसल्याने एकच खळबळ उडाली. घरातील सर्वजण जेऊन झोपण्याच्या तयारीत होते, तेवढ्यातच बुटांच्या कपाटात काहीतरी वळवळताना दिसलं. जवळ जाऊन पाहिल्यावर कपाटामागे एक भलामोठा साप फणा काढून बसला होता. सापाला पाहून घरातल्या सर्वांनी किंचाळायला सुरुवात केली. मात्र साप आपल्या अंगावर उडी मारेल की काय, अशा भीतीने सर्वजण शांत झाले. प्रसंगावधानता राखून त्यांनी ताबडतोब वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य जितेंद्र सारथी यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने जितेंद्र सारथी यांनी सर्पमित्र शुभम निषाद यांना नीरज यांच्या घरी धाडले.
शुभम यांनी अत्यंत सावधगिरीने आधी सर्व बूट कपाटातून खाली काढले. मग कोब्रा जातीच्या या सापाला पकडून बाटलीत भरले. तेव्हा कुठे नीरज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवात जीव आला. मात्र तरीही घरात इतर कुठे साप दडून बसलेला नसेल ना, अशी भीती त्यांना रात्रभर सतावत होती. भीषण उकाडा बिबट्यालाही सोसेना, जंगलात आढळला मृतदेह; कारण वाचून अधिकारी हैराण दरम्यान, सर्पमित्र जितेंद्र सारथी यांनी याबाबत म्हटलं की, ‘ग्रामीण आणि शहरी भागांतून मदतीसाठी आम्हाला बरेच फोन येत असतात. यावरून लोकांमध्ये वन्य प्राण्यांबाबत जागरूकता निर्माण झाल्याचं दिसून येतं. लोक सापाला मारूही शकतात किंवा सापाला मारण्याच्या नादात त्यांना स्वतःलाही इजा होऊ शकते. मात्र ते असं पाऊल उचलण्यापूर्वी आम्हाला बोलवतात. त्यामुळे आम्ही वेळेत सापाचा आणि लोकांचा जीव वाचवू शकतो.’ त्याचबरोबर त्यांनी आपला हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरू नका, मदतीसाठी 8817534455, 7999622151 या क्रमांकांवर संपर्क करा, असं त्यांनी सांगितलं. सर्पमित्र जितेंद्र सारथी सांगतात की, ज्याप्रकारे ग्रामीण आणि शहरी भागातून बचावाचे आवाहन येत आहे, त्यावरून लोकांमध्ये बरीच जागृती झाल्याचे दिसते. जी चांगली गोष्ट आहे. वन्य प्राणी, पक्षी आणि साप यांचे रेस्क्यू कॉल सतत येत असतात आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून लोकांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.