सृजित अवस्थी, प्रतिनिधी पिलिभीत, 7 जून : ‘सांड’ किंवा ‘सांड की औलाद’ असं आपण एखाद्याला मस्करी मस्करीत बोलून जातो. परंतु खरंच आपल्यासमोर एखादा सांड येऊन उभा राहिला तर? काय होईल? उत्तर प्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्यात एक सांड म्हणजेच वाळू केवळ माणसांच्या समोर येऊन उभा राहिला नाही, तर चक्क एका शेतकऱ्याच्या घरावरच जाऊन बसला. पिलिभीतच्या लालपुरीया साहब सिंह गावात सकाळच्या सुमारास ही घटना घडली. एक पिसाळलेला वाळू गायीच्या मागे धावत होता. घामाघूम गाय जीव मुठीत धरून शेतकरी नन्हेलाल यांच्या घरावर चढली, तर तिच्या मागे वाळूही वर चढला. गावकऱ्यांनी हे पाहिल्यावर गावात एकाच खळबळ उडाली. परंतु नन्हेलाल यांच्या घराचं काही नुकसान होऊ नये म्हणून सर्वांनी या दोघांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गायीला काही वेळातच खाली उतरवण्यात यश आलं, मात्र वजनदार वाळू काही सहजासहजी खाली उतरायला तयार नव्हता. गावकरी त्याच्याशी अक्षरश: झुंजले परंतु वाळू आपल्या जागेवरून किंचितही हलला नाही. तब्बल 10 तास तो तिथेच बसून होता.
गावकऱ्यांनी अखेर याबाबत जिल्हा पशू चिकित्सा कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर तातडीने बचावपथक तिथे दाखल झालं. वाळूचं वजन अतिशय जास्त असल्याने त्याला सहज उतरवणं शक्य नव्हतं. त्यामुळे पथकाने त्याला इंजेक्शनद्वारे काही वेळासाठी भूळ देऊन उतरवायचं ठरवलं. मात्र गावकऱ्यांनी त्यांना असं करण्यापासून थांबवलं. काहीही झालं तरी कोणत्याही प्राण्याला इजा करणं, हे धर्माच्या विरोधात आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र बचाव पथकाने त्यांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी त्यांचं काहीही ऐकून न घेता त्यांना परत पाठवलं. दरम्यान, आतादेखील गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच या वाळूला सुखरूप खाली उतरवलं जाईल, असं जिल्हा पशू चिकित्साधिकारी डॉ. अरविंद कुमार गर्ग यांनी सांगितलं आहे.