नवी दिल्ली, 25 मे : देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळं सर्व जनजीवन ठप्प झालं. लोकं आपल्या घरांमध्ये कैद झाली. घरातच बसून काम करू लागली. ही झाली सामान्य लोकांची परिस्थिती, मात्र लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला तो मजूरांना, कामगारांना, परराज्यात अडकलेल्या सामान्यांना. आपल्याच घरी जाण्यासाठी त्यांना जीव धोक्यात टाकावा लागत आहे. याच सगळ्यात परिस्थितीचं वर्णन करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या 46 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये मजूर आणि सामन्य लोकांच्या जीवनातील फरक दाखवण्यात आला आहे. एकीकडे रोज नवनवीन पदार्थ सामान्यांच्या घरात केले जात आहेत, तर दुसरीकडे पायी चालणाऱ्या मजूरांना पाणीही मिळत नाही आहे. एसीमध्ये एकीकडे काम करणारे आपण तर भर उन्हात पोरा बाळांना घेऊन फिरणारे मजूर. हा व्हिडीओ देबज्योती साहा नावाच्या एका अॅनिमेटरनं तयार केला आहे.
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या मजूरांचे काम गेलं, त्यामुळं जवळ होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपले. पर्याय उरला होतो तो एकच...घर गाठणं. मात्र लॉकडाऊनमुळे ट्रेन, बस बंद असल्यामुळं अखेर लाखो मजूरांनी चालत आपला प्रवास सुरू केला. काहींना घराची पायरी चढली...तर काहींनी रस्त्यातच प्राण सोडले. सरकारच्या वतीनं रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असली तरी, अजूनही असंख्या मजूर चालत घरी जात आहेत. देबज्योती यांचा हा व्हिडीओ घरात बसून टीव्हीवर मजूरांची स्थिती पाहणाऱ्यांसाठी एक चपराख आहे. हा व्हिडीओ नक्कीच अस्वस्थ करणारा आहे.