खार्कीव्ह (युक्रेन), 2 मार्च : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा (Russia-Ukraine war) आज तब्बल सातवा दिवस आहे. गेल्या सात दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये प्रचंड नासधूस सुरु आहे. रशियाकडून (Russia) मोठमोठ्या शहरांवर लक्ष केलं जात आहे. रशियाच्या हवाई आणि नौदलाकडून प्रचंड आक्रमकपणे हल्ला सुरु आहे. विशेष म्हणजे युक्रेनने (Ukraine) देखील आत्मसन्मान सोडलेला नाही. युक्रेनच्या सैन्याकडून तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. या युद्धात शेकडो युक्रेनिन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी असणाऱ्या खार्कीव्ह (Kharkiv) शहरात कालपासून रशियाकडून हल्ला सुरु आहे. रशियाकडून काल झालेल्या हल्ल्यात भारताच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. ही माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. खार्कीव्हमध्ये असलेल्या भारतीय दुतावासाने (Indian Embassy) एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या सूचनेत त्यांनी सर्व भारतीयांना तातडीने खार्कीव्ह सोडण्याचा सल्ला दिला आहे. “खार्कीव्हमधील सर्व भारतीय नागरिकांना तातडीचा सल्ला. त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी तातडीने खार्कीव्ह सोडावे. शक्य तितक्या लवकर पेसोचिन, बाबे, बेझल्युडोव्काच्याकडे जा. युक्रेनियन वेळेनुसार सर्वांनी संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत खार्कीव्ह सोडावं”, असा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे.
URGENT ADVISORY TO INDIAN STUDENTS IN KHARKIV.@MEAIndia @PIB_India @DDNational @DDNewslive pic.twitter.com/2dykst5LDB
— India in Ukraine (@IndiainUkraine) March 2, 2022
( रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंता वाढली ) रशिया आणि युर्केन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळताना दिसत आहे. रशियन सैनिकांकडून मिसाईल, गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यामध्ये शेकडो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच भारताच्या दोन विद्यार्थ्यांचा या युद्धादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. युद्धामुळे हजारो भारतीय अद्यापही युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी आणि मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शेकडो भारतीयांना मायदेशी आणण्यात भारताला यश आलं आहे. हे ऑपरेशन अद्यापही सुरु आहे. अनेक भारतीय युक्रेन सोडून शेजारच्या देशामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांची अडवणूक केली जात आहे. रशियन सैनिकांकडून त्यांच्यावरही हल्ला केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धाच्या परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना स्वत:ची सुरक्षा करणं हे मोठं आव्हान आहे.