नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : मागील काही काळापासून ऑनलाईन बँकिंगमध्ये (Online Banking) मोठी वाढ झाली आहे. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआयद्वारे ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. एकीकडे ऑनलाईन ट्रान्झेक्शन वाढत असताना, दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सुरक्षा अतिशय महत्त्वाची ठरते. ऑनलाईन फ्रॉडवेळी ग्राहकाची चूक नसताना, त्याच्या अकाउंटमधून पैसे काढले गेल्यास, ही जबाबदारी कोणाची आहे, हा सर्वात मोठा प्रश्न असतो.
नॅशनल कंज्यूमर डिस्प्यूट रेट्रेसल कमिशनने (NCDRC) नुकतंच फ्रॉड ट्रान्झेक्शन प्रकरणांत बँकेला ग्राहकाची चूक असल्याचं सिद्ध करता आलं नाही, तर याची जबाबदारी बँकेची असेल आणि त्याची भरपाई करावी लागेल, असं सांगितलं आहे. सध्याच्या या डिजीटल काळात डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करुन ग्राहकाच्या अकाउंटमधून पैसे चोरी करण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेला याची भरपाई द्यावी लागू शकते.
एखाद्या ग्राहकाचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवलं, तर ती ग्राहकाची चूक मानली जाते. परंतु कार्ड हरवलं नसेल, तरी ते हॅक करुन ट्रान्झेक्शन केलं गेल्यास ही चूक ग्राहकाची मानली जाणार नाही. अशा प्रकरणात बँक नुकसान भरपाई करेल. अशा प्रकरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंगमधील सुरक्षेबाबत पुरेशी पावलं न उचलल्याने बँकेला दोषी ठरवलं जाईल.
RBI नोटिफिकेशन -
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 14 डिसेंबर 2017 रोजी एक नोटिफिकेशन जारी केलं होतं. ज्यात फ्रॉड प्रकरणात काय पर्याय आहेत, याची माहिती देण्यात आली होती. जर बँकेची चूक असेल किंवा थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने फसवणूक झाली असेल (अशा वेळी बँक आणि ग्राहक दोघेही जबाबदार नसतील), या दोन्ही प्रकरणांमध्ये ग्राहकाची जबाबदारी शून्य आहे. बँक पूर्णपणे नुकसान भरपाई देईल. परंतु ग्राहकाला फसवणुकीच्या तीन कामकाजाच्या दिवसांत बँकेला याबाबत माहिती द्यावी लागेल.
जर ग्राहकाने एखाद्याला अकाउंटसंबंधी माहिती ओटीपी किंवा इतर डिटेल्स दिले आणि त्यानंतर काही फ्रॉड झाल्यास, याची संपूर्ण जबाबदारी ग्राहकाची असेल. बँकेला याची माहिती दिल्यानंतरही फ्रॉड ट्रान्झेक्शन केले गेल्यास, त्यासाठी बँकेला जबाबदार ठरवलं जाईल.
7 दिवसांपर्यंत रिपोर्ट करण्याची संधी -
बँक आणि ग्राहक दोघांची चूक नसेल आणि तरीही ऑनलाईन ट्रान्झेक्शन केले गेले असतील, तर 4 ते 7 कामाच्या दिवसांत रिपोर्ट केल्यास ग्राहकही अंशत: जबाबदार असेल. वेगवेगळ्या खात्यांसाठी हे वेगवेगळं आहे. परंतु कोणत्याही फसवणुकीमध्ये ग्राहकाचं जास्तीत जास्त नुकसान 25000 रुपये असेल. जर त्याने ही माहिती तीन कामकाजाच्या दिवसांत दिली तर त्याची जबाबदारी शून्य आहे. पण सात दिवसानंतर फसवणुकीची तक्रार आली, तर वेगवेगळ्या बँकांचं वेगवेगळं धोरण आहे, त्यानुसार मार्ग काढला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Tech news