मुंबई, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने 16 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं आहे. एलेक्स हेल्सने नाबाद 86 आणि जॉस बटलरने नाबाद 80 रन केले. भारतावर दणदणीत विजय मिळवून इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनलचा मुकाबला रंगेल. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून शाहबाज शरीफ यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘या रविवारी 152/0 विरुद्ध 170/0 असा सामना होणार,’ असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हे ट्वीट करून भारतावर निशाणा साधला आहे. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये 170/0 म्हणजेच 170 रनवर एकही विकेट न गमावता भारताच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. याआधी मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचं आव्हान 152/0 असा स्कोअर करून पार केलं होतं. यावरूनच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 152/0 विरुद्ध 170/0 असं ट्वीट केलं आहे.
So, this Sunday, it’s:
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) November 10, 2022
152/0 vs 170/0
🇵🇰 🇬🇧 #T20WorldCup
पाकिस्तानसाठी डेजाव्हू मुमेंट पाकिस्तानसाठी मात्र या वर्ल्ड कपमध्ये 1992 वर्ल्ड कपची पुनरावृत्तीच होत आहे. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान ग्रुप स्टेजलाच स्पर्धेबाहेर जायच्या मार्गावर होती, यंदाही पाकिस्तानची परिस्थिती तशीच होती. यावेळीही 1992 प्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचा पावसाने घात केला, तसंच 1992 आणि यावेळीही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. 1992 आणि यंदाही पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सेमी फायनल झाली, तसंच त्यावेळसारखीच फायनलही पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 1992 वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपमध्ये गतविजेती टीमही ऑस्ट्रेलियाच आहे. 1992 वर्ल्ड कपच्या फायनलप्रमाणे टी-20 वर्ल्ड कपची फायनलही मेलबर्नमध्ये होणार आहे, त्यामुळे फायनलमध्येही याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास पाकिस्तानचे चाहते व्यक्त करत आहेत.