मुंबई, 02 नोव्हेंबर: सध्या ऑस्ट्रेलियात आयसीसी टी20 वर्ल्ड कप सुरु आहे. याचदरम्यान आज आयसीसीनं टी20 रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये टीम इंडियासाठी एक गुड न्यूज आहे. कारण या यादीत गेले काही महिने पाकिस्तानचं असलेलं वर्चस्व मोडीत काढून एका भारतीय खेळाडूनं पहिला नंबर पटकावला आहे. हा खेळाडू आहे टीम इंडियाचा मधल्या फळीतला भरवशाचा बॅट्समन सूर्यकुमार यादव. सूर्यानं टी20 रँकिंगमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थान गाठलंय. त्यानं पाकिस्तानच्या रिझवानला मागे टाकलं. सूर्याचा सुपर फॉर्म पदार्पणापासूनच सूर्यकुमारनं भारतीय संघात आपली वेगळी छाप पाडली आहे. आज तो टी20 टीममधला चौथ्या नंबरचा सर्वात भरवशाचा बॅट्समन आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपच्या तीन मॅचमध्ये त्यानं 2 अर्धशतकं झळकावली आहेत. वर्ल्ड कपमधल्या याच कामगिरीचा सूर्याला फायदा झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या रिझवानला मागे टाकून सूर्या नंबर वन बनला आहे. त्या दोघांमधलं पॉईंट्सचं अंतरही जास्त आहे. सूर्याच्या खात्यात 863 तर रिझवान 842 रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
𝐒𝐊𝐘 𝐇𝐈𝐆𝐇 🌟
— ICC (@ICC) November 2, 2022
Suryakumar Yadav is the new No.1 Men's T20I batter 👑
More 👉 https://t.co/DBmrAmzBYB#T20WorldCup | @MRFWorldwide pic.twitter.com/MUAgXYJFfY
दीड वर्षात मोठी भरारी सूर्यकुमारचं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होऊन दीडच वर्ष झालं आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सूर्यकुमारनं टी20 क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला. त्यानंतर सूर्याची गाडी सुसाट वेगानं सुटली. टीम इंडियात त्यानं स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. सूर्याची आतापर्यंतची टी20 क्रिकेटमधली ही कामगिरी पाहा… सामने - 38 डाव - 35 धावा - 1179 100/50 - 1/11 स्ट्राईक रेट - 177.03 हेही वाचा - Cricket: IPLमध्ये बनला करोडपती, आता टीम इंडियामध्ये मिळाली जागा; वर्षभरात बदललं ‘या’ खेळाडूचं नशीब मुंबई क्रिकेट ते टीम इंडिया व्हाया आयपीएल सूर्यकुमार यादव मूळचा मुंबईचा. मुंबईच्या टीममधून सूर्यानं 2010 साली रणजी पदार्पण केलं. रणजीत त्यानं मुंबईसाठी धावांचा पाऊस पाडला. त्यानं मुंबईचं नेतृत्वही केलं. पण भारताची कॅप मात्र त्याला उशीरा मिळाली.
पण मधल्या काळात फर्स्ट क्लास क्रिकेटसह आयपीएलमध्ये सूर्याचं नाणं खणखणीत वाजलं. 2012 आणि 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सनं आय़पीएलचं विजेतेपद पटकावलं. त्यात सूर्यकुमारचा मोटा वाटा होता.
त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सूर्या दाखल झाला. तिथेही त्यानं रोहितच्या नेतृत्वात खेळताना दमदार कामगिरी केली. त्याच्याच जोरावर सूर्याला अखेर 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात जागा मिळाली. आणि आज अवघ्या दीड वर्षात सूर्या टी20त नंबर वन बनला.