मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवली जाणार आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याला संघात संधी मिळणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत.
मराठमोळा क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याचा काल 27 फेब्रुवारी विवाह पारपडला. शार्दुलने त्याची मैत्रीण मिताली परुळकर हिच्याशी लग्न केले. कर्जत येथील फार्महाऊसवर त्याचा शाही विवाह पारपडला. या सोहोळ्याला कर्णधार रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका, धनश्री चहल, श्रेयस अय्यर देखील उपस्थित होते. लग्नाला एक दिवस होत नाही तोवरच शार्दूल ठाकूर याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात खेळण्याचं बोलावणं आलं आहे. रोहित शर्माने अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघामध्ये शार्दुलला सामील करून घेण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाला रोहित शर्मा ?
उद्या इंदोर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “जर इंदोर कसोटी सामन्याचा निकाल आम्हाला हवा तसा लागला, तर अहमदाबाद कसोटीचा उपयोग WTC फायनलची तयारी म्हणून केला जाण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर देखील या योजनेचा एक भाग आहे. पण कालच त्याचे लग्न झाले. पण पुढच्या कसोटीत नक्कीच काहीतरी वेगळे करण्याचा विचार आपण करू शकतो.”
शार्दूल ठाकूर याने जानेवारी 2021 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत अर्धशतक झळकावण्याव्यतिरिक्त 7 बळी घेतले होते. भारताने हा सामना 3 विकेटने जिंकून मालिका 2-1 ने जिंकली होती. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत शार्दूल भारतीय संघाचा भाग नसला तरी चौथ्या सामन्यात त्याला संघात घेण्याचा विचार केला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Rohit sharma, Shardul Thakur, Test cricket