मुंबई, 17 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs SRH) यांच्यातल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईने टीममध्ये दोन बदल केले. मयंक मार्कंडे (Mayank Markande) आणि संजय यादव (Sanjay Yadav) यांना संधी देण्यात आली आहे, तर कुमार कार्तिकेय आणि ऋतीक शौकीन यांना बाहेर करण्यात आलं. टॉसवेळी कॉमेंटेटर इयन बिशप (Ian Bishop) यांनी रोहितला तू प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर का झाला नाहीस? असा प्रश्न विचारला.
'मुंबई आता प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकत नाही, त्यामुळे वर्कलोड बघता तू आणि बुमराह (Jasprit Bumrah) प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर का बसत नाही?', असं बिशप यांनी विचारलं. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, 'टीमचा कोर ग्रुप वारंवार खेळत राहावा, हे गरजेचं आहे. टीम म्हणून आम्हाला काही गोष्टींसोबत पुढे जावं लागतं. काही खेळाडूंना आराम दिला जावा, याचा विचार आम्ही नक्कीच केला होता.'
मुंबई इंडियन्सने या हंगामात तब्बल 22 खेळाडूंना संधी दिली. राहुल बुद्धी, आर्यन जुयाल आणि अर्जुन तेंडुलकर हे तीनच खेळाडू मुंबईकडून खेळले नाहीत. शेवटच्या सामन्यात आणखी काही नव्या खेळाडूंना संधी मिळेल, असे संकेत रोहित शर्माने टॉसवेळी दिले, त्यामुळे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाची आशा वाढली आहे.
रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे सीनियर आणि महत्त्वाचे खेळाडू आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आणि बुमराह उपकर्णधार आहे. हे दोन्ही खेळाडू लागोपाठ क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल 2022 नंतर लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज आणि मग इंग्लंड दौरा आहे. खेळाडूंवरचा शारिरिक ताण बघता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma, SRH