मुंबई, 2 ऑगस्ट : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs West Indies 2nd T20) पराभव झाला. रोमांचक अशा या सामन्यात वेस्ट इंडिजने शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला हा सामना क्रिकेटपेक्षा ढिसाळ नियोजनामुळेच चर्चेत राहिला. या सामन्यात भारताचे तीन खेळाडू अर्शदीप सिंगची (Arshdeep Singh Jersey) जर्सी घालून मैदानात उतरले. तीन क्रिकेटपटूंनी एकाच नावाची जर्सी घातल्यामुळे बराच गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), आवेश खान (Avesh Khan) यांच्याशिवाय स्वत: अर्शदीपनेही त्याच्या नावाची जर्सी घातली होती. याआधी वनडे सीरिजमध्येही दीपक हुड्डा प्रसिद्ध कृष्णाची जर्सी घालून खेळत होता. दुसऱ्या टी-20 मध्ये खेळाडूंच्या किट वेळेवर पोहोचल्या नसल्यामुळे सूर्यकुमार आणि आवेशला अर्शदीपची जर्सी घालून खेळावं लागल्याचं बोललं जात आहे, पण यामुळे टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मॅचच्या सुरूवातीला त्रिनिदादहून सेंट किट्समध्ये टीमचं सामान पोहोचायला वेळ लागला, त्यामुळे मॅच सुरू व्हायला तीन तास उशीर झाला. या सामन्याला उशीरा सुरूवात झाल्यामुळे आज होणाऱ्या तिसऱ्या सामनाही खेळाडूंना रिकव्हरी करण्यासाठी योग्य वेळ मिळावा म्हणून उशीरा सुरू होणार आहे. ओबेड मकॉयने भारताच्या 6 विकेट घेतल्यानंतर ब्रेण्डन किंगने अर्धशतकीय खेळी करत वेस्ट इंडिजला 5 विकेटने विजय मिळवून दिला. 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 6 विकेट घेणाऱ्या ओबेड मकॉयला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये वेस्ट इंडिजच्या बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्रेण्डन किंगने आव्हानाचा पाठलाग करताना 52 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 68 रन केले. विकेट कीपर डेवन थॉमसने 19 बॉलमध्ये नाबाद 31 रनची खेळी करून वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.