मुंबई : भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा संपणार आहे. एकदिवसीय मालिकेचा अंतिम सामना ३० नोव्हेंबरला बुधवारी खेळण्यात येणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत असून मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत अखेरचा सामना जिंकावाच लागेल.
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ३०० हून अधिक धावा केल्यानतंरही पराभवाचा सामना करावा लागला होता. टॉम लाथमच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ७ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. याआधी पहिल्या टी २० मालिकेत भारताने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली १-० ने विजय मिळवला होता.
भारतीय संघाने १९८१ नंतर न्यूझीलंडविरुद्ध द्विपक्षीय एकदिवसीय मालिका सलग गमावलेली नाही. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ नकोसं रेकॉर्ड नावावर होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करेल. याआधी २०२० मध्ये दोन्ही संघात अखेरची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. तेव्हा न्यूझीलंडने घरच्या मैदानावर मालिकेत ३-० अशा पराभव केला होता.
Ind vs NZ ODI: सूर्यकुमार यादवची सगळी मेहनत वाया, मैदान सुकवण्यासाठी मैदानात उतरला पण... Video
१९८१ मध्ये सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २ सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत व्हावं लागलं होतं. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघ १४० धावाच करू शकला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ५७ धावांनी विजय मिळवला होता. न्यूझीलंडच्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १५३ धावाच करू शकला होता. याआधीच्या मालिकेत भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता.
सध्याच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. श्रेयस अय्यर, कर्णधार धवन आणि शुभमन गिलने अर्धशतके केली होती. मात्र केन विल्यम्सन आणि टॉम लाथम यांनी २०० पेक्षा जास्त धावांची नाबाद भागिदारी करत सामना न्यूझीलंडला जिंकून दिला.
लाथमने १०४ चेंडूत नाबाद १४५ धावा केल्या होत्या. १९ चौकार आणि ५ षटकार लगावले होते. तर कर्णधार विल्यम्सनने ९८ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला होता. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर या दोघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याच्या ८ षटकात ६८ धावा किवी फलंदाजांनी लुटल्या तर यात एकही विकेट अर्शदीपला घेता आली नाही.
फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या १० षटकात ६७ धावा न्यूझीलंडने काढल्या. त्यालासुद्धा एकही विकेट घेता आली नाही. अष्टपैलू क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. त्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले होते. तर गोलंदाजीत १० षटकात फक्त ४२ धावा दिल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Hardik pandya, New zealand, Sunil gavaskar, Team india