कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) रोमांचकरित्या ड्रॉ झाली. अखेरच्या बॉलपर्यंत गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडची शेवटची विकेट घेता आली नाही, त्यामुळे भारताचं मॅच जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. भारताच्या विजयात अडथळा ठरले ते दोन भारतीय खेळाडूच. न्यूझीलंडकडून खेळणारे रचीन रविंद्र (Rachin Ravindra) आणि एजाझ पटेल (Ajaz Patel) या दोन भारतीय वंशांच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. भारतीय टीमला या मॅचमध्ये विजयासाठी अखेरच्या 8.4 ओव्हरमध्ये फक्त एका विकेटची गरज होती, पण रचिन रवींद्र आणि एजाझ पटेल यांची जोडी तुटली नाही. रचिनची ही पदार्पणाची टेस्ट होती.
रचिन रविंद्र याच्या पालकांनी त्याचं नाव राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावरून ठेवलं आहे. रचिनच्या पालकांनी राहुल द्रविडचा र आणि सचिन तेंडुलकरचा चिन असं मिळून त्याचं नाव रचिन ठेवलं. तर एजाझ पटेल याचा जन्म मुंबईमध्ये झाला, यानंतर तो कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायिक झाला. रचिन आणि एजाझने अखेरच्या 52 बॉलवर एकही विकेट गमावली नाही. या दोघांच्या उत्कृष्ट बॅटिंगमुळे न्यूझीलंडला हा सामना ड्रॉ करण्यात यश आलं.
भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या या सामन्यात पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने शानदार शतक केलं, ज्यामुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 345 रन केले. यानंतर अक्षर पटेलने 5 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडचा डाव 296 रनवर संपवला, ज्यामुळे भारताला 49 रनची आघाडी मिळाली. भारतीय टीमने दुसऱ्या इनिंगमध्ये 7 विकेट गमावून 234 रनवर डाव घोषित केला, त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 9 विकेट गमावून 165 रन केले.
रचिन रविंद्रने मॅचच्या अखेरच्या दिवशी 91 बॉलचा सामना केला आणि 18 रन केले, तर एजाझ पटेलने 23 बॉल खेळून 2 रन केले. या दोघांनी 52 बॉलमध्ये 10 रनची नाबाद पार्टनरशीप केली. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक आणि अर्धशतक करणाऱ्या श्रेयस अय्यरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Team india