मुंबई, 3 फेब्रुवारी : 9 फेब्रुवारी पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यामालिकेत विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी सध्या भारतीय संघ जय्यत तयारी करताना दिसत आहे. अशातच या मालिकेनंतर भारताचे 3 स्टार क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला असून यात जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यासारखे खेळाडू दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करणार आहेत. तर काही खेळाडूंसाठी ही कसोटी मालिका त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका ठरू शकेल. हे ही वाचा : भारताच्या माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; पाहा नेमके काय आहे प्रकरण? उमेश यादव :
भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादव भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. उमेशने आतापर्यंत 54 कसोटी सामने खेळले असून यात 165 विकेट्स घेतल्या आहेत. एका दशकाहून अधिक कालावधीच्या कसोटी कारकिर्दीत उमेशने आपल्या गोलंदाजीत सातत्य ठेऊन अनेक फलंदाजांच्या विकेट घेतल्या. उमेशने बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सात विकेट्स घेतल्या आहेत. आगामी मालिकेत देखील प्रभावी कामगिरी करून उमेश यादव कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. उमेश यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 48 विकेट्स घेतल्या असून त्याला आगामी मालिकेत 50 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे.
चेतेश्वर पुजारा : चेतेश्वर पुजारा देखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करू शकतो. आतापर्यंतच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीत चेतेश्वर पुजाराची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. पुजारा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा आणि सर्वाधिक शतके (५) ठोकणारा फलंदाज आहे.
मागील बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताच्या कसोटी मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी मालिकेसाठीही तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशविरुद्ध नुकतेच शतक झळकावून त्याने पुन्हा आपली प्रतिभा सिद्ध केली होती. आगामी कसोटी मालिकेत प्रभाव पाडून पुजाराला फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
जयदेव उनादकट : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर कसोटीतून जयदेव उनादकट हा निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. कसोटी पदार्पण केल्यानंतर उनाडकटला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 10 वर्षांनंतर संधी मिळाली होती. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला जयदेव आतापर्यंत केवळ 2 कसोटी खेळला आहे.
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याला जयदेवला कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातून संधी मिळणे काहीसे अवघड आहे. तेव्हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जयदेवच्या कारकिर्दीसाठी शेवटची ठरू शकते. जयदेव सौराष्ट्र संघातून रणजी क्रिकेट खेळतो. काहीच दिवसांपूर्वी त्याने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सलग तीन विकेट घेऊन हॅट्रिक केली होती. भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन , आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.