मुंबई, 9 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट मंगळवारपासून सुरू होत आहे. दोन्ही टीमनं प्रत्येकी एक टेस्ट जिंकल्याने सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता मालिकेचा निकाल केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये होणार आहे. या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) परत येणार आहे. त्यामुळे भारतीय टीममध्ये एक बदल नक्की आहे. विराटला कुणाच्या जागी खेळवावं अशी चर्चा सुरू असतानाच टीम इंडियाच्या माजी कोचनी तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) ब्रेक देण्याची मागणी केली आहे.
जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पंत तीन बॉल खेळल्यानंतर शून्य रनवर आऊट झाला. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्येही त्याने फक्त 17 रन केले होते. रहाणे आणि पुजाराने झुंजार अर्धशतकं केल्यानंतर पंतला जबाबदारीने खेळण्याची गरज होती, पण तो अपयशी ठरला. पंतच्या बेजबाबदार खेळावर तेव्हा कॉमेंट्री करणारे भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पंतच्या खेळावर नाराज झालेले गावसकर हे एकमेव माजी क्रिकेटपटू नाहीत. 1983 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचे सदस्य आणि टीम इंडियाचे माजी कोच मदनलाल (Madan Lal) यांनी तर पंतला टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक देण्याची मागणी केली आहे. 'आज तक' वरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतच्या खेळावर जोरदार टीका केली.
न्यूझीलंडच्या कॅप्टनचं दमदार शतक, टीम इंडियाच्या माजी कोचची बरोबरी
'पंतला ब्रेक दिला पाहिजे. आपल्याकडे ऋद्धीमान साहा आहे. तो समंजस बॅटर आहे. खूप चांगला विकेटकिपर आहे. पंत टेस्ट क्रिकेटमध्ये कशी बॅटींग करणार याचा निर्णय करावा लागेल. त्याच्या डोक्यात गोंधळ असेल तर त्याला ब्रेक देणे हेच फायदेशीर ठरेल. तो मॅच विनर खेळाडू आहे. तरीही या पद्धतीने बॅटींग करू शकत नाही. त्याला स्वत:साठी नाही तर टीमसाठी बॅटींग करणे आवश्यक आहे,' असे लाल यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाला द्रविड
टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने दुसऱ्या टेस्टनंतर मीडियाशी बोलताना पंतच्या खेळाबद्दल टीम मॅनेजमेंटची भूमिका स्पष्ट केली होती. 'ऋषभ सकारात्मक खेळतो आणि खास पद्धतीने बॅटींग करतो हे आपल्याला माहिती आहे. या पद्धतीने बॅटींग करून त्याला यश देखील मिळाले आहे. पण, आम्ही नक्कीच पंतशी चर्चा करू. त्या पद्धतीचा फटका मारण्याची वेळ आणि मॅचमधील परिस्थितीवर ही चर्चा होईल.
क्रिकेटपटूंना थेट निवृत्त होण्यास बंदी, बोर्डाने लागू केले कठोर नियम
कुणीही ऋषभ पंतला तू आक्रमक किंवा सकारात्मक खेळू नकोस हा सल्ला देणार नाही. पण, कधी-कधी या पद्धतीने खेळण्यासाठी वेळेचे भान जपणे आवश्यक असते. माझ्या मते मैदानात गेल्यावर थोडा वेळ तिथं खेळून काढणे अधिक योग्य आहे. पण, ऋषभमुळे टीमचा फायदा काय होतो हे सर्वांना माहिती आहे. तो आमच्यासाठी काही वेळात मॅचचं चित्र बदलू शकतो. त्याला नैसर्गिक खेळाला मुरड घालून वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा सल्ला देता येत नाही. पण, एक बॅटर म्हणून प्रतिस्पर्धी टीमवर आक्रमक खेळ कधी करायचा हे समजणे आवश्यक आहे.' असे द्रविडने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.