अहमदाबाद 28 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) झाली. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील ही मॅच फक्त दोन दिवसांमध्ये संपली. त्यामुळे या स्टेडियमचं पिच सध्या वादात सापडलं आहे. याच पिचवर भारत-इंग्लंड सीरिजमधील चौथी आणि शेवटची टेस्ट चार मार्चपासून सुरु होणार आहे. ही टेस्टही याच पद्धतीनं लवकर संपली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल (ICC) या प्रकरणाची गंभीर दखल घेऊ शकते. त्यामुळे आयसीसीची संभाव्य कारवाई टाळण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) युक्ती करण्याची शक्यता आहे. काय आहे युक्ती? अहमदाबादमधील चौथ्या टेस्टमधील पिचही स्पिनर्सना मदत करण्याची शक्यता कमी आहे. कारण, भारतीय टीमची या विषयावर कोणताही धोका पत्कारण्याची तयारी नाही. या विषयाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ‘बॉलला समान उसळी मिळेल अशी पिच तयार होण्याची अपेक्षा आहे. ही बॅटिंगला मदत करणारी पिच असेल. चौथ्या टेस्टमध्ये पारंपरिक लाल बॉलनं मॅच होणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे.’ इंडियन प्रीमियर लीग आणि क्रिकेट वर्ल्ड कपमधील अनेक मॅच या पिचवर होणार आहेत. त्यामुळे या पिचवरील कारवाई टाळण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल. चौथ्या टेस्टनंतर मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ या पिचबाबतचा रिपोर्ट आयसीसीला सादर करतील त्यानंतर याबाबत आयसीसी पुढील निर्णय घेईल. बीसीसीआयसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या टीमनं याबाबत अजून कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. ( वाचा : अश्विननं केली ब्रिटीश पत्रकाराची बोलती बंद, ‘त्या’ प्रश्नाला दिलं खणखणीत उत्तर ) चार टेस्टच्या या मालिकेत भारतीय टीम सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (WTC) फायनल गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं आवश्यक आहे. तसं झालं तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. भारतानं ही टेस्ट गमावल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानं इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.