अहमदाबाद, 28 फेब्रुवारी : आर. अश्विननं (Ravichandran Ashwin) त्याच्या स्पिन बॉलिंगच्या जादूनं इंग्लंडच्या क्रिकेट टीमची बोलती बंद केली आहे. त्याचबरोबर त्यानं चौथ्या टेस्टच्या पूर्वी बोलताना ब्रिटीश पत्रकाराची बोलती देखील बंद केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या (Narendra Modi Stadium) दर्जावर प्रश्न विचारणाऱ्या त्या पत्रकाराला अश्विननं खणखणीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला अश्विन?
अश्विननं इंग्लंडच्या पत्रकाराला विचारलं, ‘माझा प्रश्न आहे की चांगलं पिच नेमकं कसं असतं? ते कोण ठरवतं? चांगल्या पिचवर बॉलर चांगली बॉलिंग करु शकतो, तसंच बॅट्समनलाही त्याचा दर्जा दाखवण्याची संधी मिळते. पहिल्या दिवशी सीम बॉलिंगला मदत होईल, पुढील दोन दिवस चांगली बॅटींग होईल आणि शेवटच्या दोन दिवसांमध्ये बॉल स्पिन होईल, हे नियम कुणी बनवले आहेत?'
तो पुढे म्हणला की, 'आपल्याला याच्या पुढं जाण्याची गरज आहे. इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला या पिचचा त्रास होत आहे हे मला वाटत नाही. त्यांना या परिस्थितीमध्ये खेळायचं आहे. स्वत:मध्ये सुधारणा करण्याची त्यांची इच्छा आहे. आम्ही देखील कोणत्याही दौऱ्यामध्ये कधी पिचवर प्रतिक्रिया दिलेली नाही.’
Ashwin pulls no punches! "What is a good cricket surface and who defines it?," @ashwinravi99 to an English journalist #INDvEND #AhmedabadTest #Pitch pic.twitter.com/pt4cxJZc6A
— Santhosh Kumar (@giffy6ty) February 27, 2021
न्यूझीलंड दौऱ्याची करुन दिली आठवण
आर. अश्विन इथंच थांबला नाही. त्यानं भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची आठवण देखील यावेळी करुन दिली. ‘मला समजत नाही पिचच्या प्रश्नावर इतकी चर्चा का होता. आम्ही विदेशात जातो तेंव्हा कुणी या विषयावर बोलतं का? आम्ही न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो होतो. तिथं दोन टेस्ट मिळून फक्त 5 दिवसांमध्ये खेळ संपला होता.’ असं अश्विननं सांगितलं.
( वाचा : IND vs ENG : पुण्यातील सामन्यांना हिरवा कंदील; पण मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी अट )
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात झालेली तिसरी टेस्ट फक्त दोन दिवसांमध्ये संपली होती. तेंव्हापासून अहमदाबादमधील पिचवर टीका होत आहे. विशेषत: इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू यामध्ये आघाडीवर आहेत.