मुंबई, 27 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मागच्या वर्षी क्रिकेटला मोठा फटका बसला. या व्हायरसच्या धोक्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द झाल्या, तसंच वर्षातील बराच काळ क्रिकेट बंद होतं. सध्या अनेक निर्बंधांमध्ये क्रिकेट सुरु आहे. कोरोना ब्रेकनंतर भारतामध्ये सध्या पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात ही मालिका होत असून या मालिकेला आता पुन्हा एकदा कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन मॅचची वन-डे मालिका ही पुण्यात (Pune) होणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे पुण्यात 23 ते 28 मार्च या दरम्यान होणारी वन-डे सीरिज धोक्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही मालिका महाराष्ट्राच्या बाहेर खेळवली जाऊ शकते, असं वृत्त ‘इंडिया टुडे’ नं दिलं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. राज्यात शुक्रवारी 8333 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 765 रुग्ण हे पुणे शहरातील होते. वन-डे मालिका दुसरिकडं खेळवण्याबाबत BCCI नं अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पुण्यातील येत्या काही दिवसांमधील परिस्थिती पाहून यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. सध्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा सुरु असलेल्या एका शहरामध्ये वन-डे मालिका खेळवली जाऊ शकते. ( वाचा : देशातला निम्मा कोरोना महाराष्ट्रात; Covid-19 चा भयानक रिपोर्ट कॅबिनेटमध्ये सादर ) भारत- इंग्लंड यांच्यातील चार मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाकडं सध्या 2-1 अशी आघाडी. इंग्लंडनं पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 227 रननं पराभव केला होता. भारतानं दुसरी टेस्ट 317 रननं जिंकून फक्त सीरिजमध्ये बरोबरी केली नाही तर पहिल्या टेस्टमधील पराभवाची परतफेड देखील केली. अहमदाबादमधील तिसरी टेस्ट भारतानं अवघ्या दोन दिवसांमध्ये 10 विकेट्सनं जिंकली. त्यानंतर आता या मालिकेतील चौथी आणि शेवटची टेस्ट 4 मार्चपासून अहमदाबादमध्येच खेळवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.