परदेशात जाण्यासाठी नेहमीच व्हिसा आणि पासपोर्टची गरज असते. तुम्ही भारताच्या कोणत्याही इतर देशात प्रवास करत असाल तर तिथे एरोप्लेन, ट्रेन किंवा जहाजाने जाता येते. यावेळी व्हिसा आणि पासपोर्ट गरजेचं असतं. पण, तुम्हाला माहित आहे का की, आपल्या देशातच असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथून ट्रेन पकडण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट आवश्यक आहे. पण का? याचं कारण आपण आज जाणून घेऊया.
हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे. खरंतर अटारी स्टेशनवरून पाकिस्तानला ट्रेन धावतात, त्यामुळे देशातील हे एकमेव स्टेशन आहे जिथे व्हिसा लागू आहे. जर तुम्ही व्हिसाशिवाय येथे पोहोचलात, तर स्टेशनवर पकडल्यानंतर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. हा मुद्दा भारत-पाकिस्तान प्रवासाशी संबंधित असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव येथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे.
दिल्ली किंवा अमृतसरहून पाकिस्तानी शहर लाहोरला जाणाऱ्या गाड्या अटारी स्टेशनवरून जातात. दोन्ही देशांतील नागरिकांसाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान वेळोवेळी रेल्वे धावल्या आहेत. यामध्ये समझौता एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पाकिस्तानशी बिघडलेल्या संबंधांमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
अटारी स्टेशनवर जबरदस्त सुरक्षा व्यवस्था आहे. गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही येथे लक्ष ठेवून असतात. अशा स्थितीत या स्टेशनवर कुली राहण्याची परवानगी नाही. सामान कितीही जड असले तरी तुम्हाला ते एकटेच उचलावे लागेल.
व्हिसा आणि पासपोर्टशिवाय अटारी स्टेशनवर पकडलेल्या व्यक्तीवर 14 फॉरेन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो, म्हणजेच व्हिसाशिवाय आंतरराष्ट्रीय हद्दीत पकडला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे अशा प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात.