तेलंगणा, 08 मार्च : 2019मध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणात धक्कादायक वळण समोर आलं आहे. तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथं अमृतावर्षीनी या मुलीच्या वडिलांनी तिच्या डोळ्यांदेखत नवरा प्रणयला ठार मारलं होतं.
यामध्ये आता आरोपी पितानेच आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जातीबाहेर लग्न केल्याच्या रागामुळेच अमृताच्या वडिलांनी ऑनर किलिंगचा अक्षम्य गुन्हा केला होता. मिळालेल्या वृत्तानुसार, मारुतीराव खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री मारुतीरावने वसवि भवनमध्ये एक खोली बुक केली आणि आज सकाळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
प्रणयच्या मृत्यूवेळी अमृती पाच महिन्यांची गरोदर होती. तिने एक गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून प्रणयचीच आठवण येते आणि आपसूक डोळे पाणवले जातात अशी प्रतिक्रिया अमृताने दिली. आपल्या पोटी प्रणयच आला असल्याचं अमृताचं स्पष्ट मत आहे. अमृताचे वडील मारुतीराव ऑनर किलिंगच्या गुन्ह्यात तुरुंगात होते. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
खरंतर सिनेमात जसं दिसतं ते प्रत्यक्षात असावं असं काही नाही, पण सिनेमा हा समाजाला आरसा दाखवतो एवढं मात्र खरं आहे. सैराट सिनेमात घरदार सोडून आपल्या प्रेमाचं स्वप्न पाहणाऱ्या आर्ची आणि परश्याचा अंत मन धस्स करून जाणारा...
बरं हे काही पहिल्यांदाच घडलं असं नाही समाजात अशा अनेक घटना आहे ज्या खोट्या प्रतिष्ठेसाठी अशा कित्येक आर्ची आणि परश्याचा जीवावर उठल्यात. तेलंगाणामध्ये अमृता आणि प्रणय यांची कहाणीही अशीच आहे....त्यांचीही चूक एवढीच होती की त्यांनी प्रेम केलं...
मिरयालगुडा येथील मारुतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मित्र प्रणयने घरच्यांचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलांकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही.
घरदार सोडून दोघंही तेलंगणाच्या मिर्यालगुडा भागात गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्या दोघांच्या संसारात तिसरा पाहुणाही लवकरच येणार होता. नव्या पाहुण्याचे स्वप्न पाहुन दोघेही आनंदी होती.
दोघे जण जात असताना प्रणयवर अज्ञात इसमाने मागून येऊन कोयत्याने वार केल्या. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रणय जागीच कोसळला.
हल्ला करणारा हल्लेखोर तेथून पळून गेला. स्थानिकांनी धावाधाव करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. अमृताच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमृताच्या वडील आणि काकांवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. आपल्या मुलींचा संसार उद्धवस्त करणारे हे दोघेही फरार झाले होते.