मुंबई, 23 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे कालपासून सुरू असलेल्या पावसाने धूमशान घातलं आहे. 24 तासात झालेल्या तुफान पावसानं महाराष्ट्र जलमय झाला आहे. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाऊस म्हटलं की मुंबईत पाणी साचणं आलंच. पण यंदा मुंबईत अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांच्या पीकाचं नुकसान झालं आहे. तरीदेखील यावर कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार (bjp Mla Ashish Shelar) यांनी ट्टीट करत सरकारला टोला लगावला आहे. 'विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!' अशा शब्दात आशिष शेलार यांनी सरकारला टोला लगावला आहे.
विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो!
सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ??
दरम्यान, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. मुंबईत पावसानं शनिवारी संध्याकाळपासून जोर धरला आणि रात्रभर धुमशान सुरू होतं. जवळपास 180 मिमीहून अधिक पावसाची नोंद पहाटेपर्यंत करण्यात आली असून आता प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आला आहे.
मुंबईत अनेक भागांमध्ये 3 फुटांपर्यंत रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्थानकात रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यानं वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे.
मुसळधार पावसामुळे आणि एकूण सध्याची परिस्थिती पाहता बृहनमुंबई महापालिकेनं आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि कामं वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच खासगी कार्यालये आणि इतर कामकाज बंद ठेवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.