03 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो, असा अंदाज केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. अलिबाग इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार यांनी यापूर्वीही देशात तिसर्या आघाडीला स्थान नाही हे स्पष्ट करताना यूपीए किंवा एनडीएला बहुमत मिळेल असं म्हटलं होतं. आता त्यांनी भाजपला पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळतील असं म्हटल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्याच्या बातमीमुळे एकच खळबळ उडाली होती. पवार एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती मात्र पवारांनी स्पष्टपणे ही शक्यता धुडकावून लावली.
राजला शाबासकी उद्धव ठाकरेंवर टीका तसंच पवार यांची राज यांना शाबासकी दिली तर उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. राज ठाकरे यांनी स्वत:चा पक्ष मेहनतीने उभा केलाय त्यांचे कष्ट दिसून येतात पण उद्धव ठाकरे भाग्यवान आहे. त्यांना त्यांच्या वडिलांची प्रस्तापित संघटनात्मक प्रॉपर्टी तयार केली ती सहजपणाने मिळालीय असं मतही पवारांनी व्यक्त केलं.
तसंच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं राजकारण करू नये. जर एखाद्या पक्षातील(भाजप) नेते दुसर्या पक्षाच्या (मनसे) अध्यक्षांना पक्षांतर करण्यासाठी वारंवार भेट घेऊन आग्रह करत असतील तर यावरून असे स्पष्ट होते की, ज्या पक्षांची युती झालीय तिचा कारभार कसा चाललाय हे दिसून येतंय अशी बोचरी टीकाही पवारांनी सेनेवर केली.