06 एप्रिल : उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस,सपा,बसपा एकाच माळेचे मणी आहेत अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. काँग्रेस सरकारला जनता कंटाळली असून यंदा भाजपचीच सत्ता येईल. या पराभवापासून काँग्रेसला आता सीबीआयदेखील वाचवू शकणार नाही असे मोदींनी म्हटले आहे.
भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी रविवारी उत्तरप्रदेशमधील बिजनौर आणि अलीगढमध्ये प्रचार सभा घेतल्या. या प्रचारसभेत मोदींनी काँग्रेस, सपा व बसपावर जोरदार टीका केली.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. काँग्रेसच्या युवराजांना देशाच्या विकासाचा मॅप बनवण्यासाठी ६० वर्ष लागली. त्याची अंमलबजावणी करायला आणखी ६०० वर्ष लागतील असा टोलाही त्यांनी लगावला. शाळेत देशात मजबूत सरकार बनणे गरजेचे असल्याने मतदारांनी भाजपला ३०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अल्पसंख्याकांच्या मुद्यावर काँग्रसनं फक्त आश्वासनं दिलीत अशी टीका नरेंद्र मोदींनी केलीय. देशभरातल्या मुस्लिम बहुल जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारने १५ सूत्री कार्यक्रमातील योजना राबवली त्यातला एकही रुपया आत्तापर्यंत खर्च करण्यात आलेला नाही असा आरोप त्यांनी केला.विकास हा सर्वसमावेश असला पाहिजे असंही ते म्हणाले.