11 जानेवारी : महापालिका निवडणुकीत प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु असं सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील सर्व जागा स्वबळावरच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांना आज (बुधवारी) फेसबुकवरुन लाईव्ह चॅटद्वारे उत्तरं दिली. यावेळी राज ठाकरे यांनी येणाऱ्या महापालिका निवडणूक, भाजप, शिवसेना, नोटाबंदी ते राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या वाद या सरख्या अनेक विषयांवर भाष्य केलं. महापालिका निवडणुकीत प्रचाराची रणनिती काय असणार असा प्रश्न विचारला असता मी ट्रेलर दाखवत नाही, थेट पिक्चरच दाखवतो, असं त्यांनी सांगितलं.
युतीचा प्रस्ताव कुणी घेऊन आलं तर त्यावर विचार करेन, असं कालच राज यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्याप त्यांना कुणीही तसा प्रस्ताव दिला नसल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलं. शिवसेना-भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. ‘जनतेला सांगण्यासारखं शिवसेना, भाजपकडं आता काहीही नाही. त्यांच्याकडं जर काही असेल तर पैसा आहे. पैशाच्या जोरावर हे पक्ष इतर पक्षाच्या लोकांना फोडत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या भाजपचाही त्यांनी समाचार घेतला. ‘महापालिकेतील भ्रष्टाचाराला शिवसेना आणि भाजप दोघेदी तितकेच जबाबदार आहेत. ऐवढ्या वर्षात भाजपला भ्रष्टाचार दिसला नाही. पण तुम्ही दोघांनी मिळूनच फावडा मारला ना असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, प्रसारमाध्यमांची भूमिका बदलत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. काही प्रसारमाध्यमांमध्ये मोदी सरकारविरोधात एकही शब्द बोलला किंवा छापून येत नाही, असा टोलाही त्यांनी काही माध्यमांना लगावला.
त्याशिवाय, नाशिकमध्ये मनसेने चांगलं काम केलं असून त्याचा फायदा पक्षाला निश्चितच होईल असंही त्यांनी सांगितलं. नाशिक महापालिकेचं कर्ज फेडून मी कामे करून दाखवली आहेत. नाशिकमध्ये केलेले काम इतर शहरांत दाखवा. अजूनही बरीच माणसं माझ्यासोबत विश्वासाने आहेत. मी पुन्हा 60 नगरसेवक निवडून आणेन, असंही राज यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv