लखनऊ, 30 सप्टेंबर: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Demolition Case) आज सीबीआयचे विशेष न्यायाधीश लखनऊतील विशेष न्यायालयात निर्णय दिला. सुनावणीदरम्यान तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टानं यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले आहे. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती का? आढावा घेऊया त्या दिवशी अयोध्येत घडलेल्या परिस्थितीचा.
6 डिसेंबर 1992 ही तारीख भारताच्या राजनैतिक इतिहासातली अशी एक तारीख आहे ज्याबाबत 28 वर्षानंतरही कलह सुरूच आहे. 1990 साली लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेपासून या घटनेला प्रारंभ झाला होता. देशभरातून आलेल्या कारसेवकांनी थेट अयोध्येत दाखल होऊन आक्रमक भूमिका घेतली. यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.
वाचा-आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
6 डिसेंबर 1992 सकाळी 6 वाजता कारसेवक बाबरी मशिदीच्या आसपासच्या परिसरात दाखल झाले. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही नरसिंव्ह राव यांनी बाबरी मशिदीच्या तापलेल्या वातावरणाबद्दल माहिती घेतली. नरसिंह राव त्यावेळी दिल्लीतील निवासस्थानी होते परंतु त्यांचं संपूर्ण लक्ष अयोध्येतील घडामोंडींकडे लागून राहिलं होतं. इकडे अयोध्येत सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा होता.अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.
वाचा-निकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया
लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंहल, के सुदर्शन यांसह अनेक नेते वादग्रस्त वातूजवळ पोहोचले. अयोध्येतील परिस्थिती केव्हाच पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती. काहीही झालं तरी कारसेवा थांबवणार नाही असा कारसेवकांचा आवेष होता.मंदीर वहीं बनाएगें म्हणत कारसेवक बाबरी मशिदीच्या ढाच्यावर तुटून पडले.
वाचा-बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
उत्तर प्रदेशात कल्याण सिंह त्यावेळी यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी दिले होते. अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. दुपारी 1 वाजून 55 वाजता आक्रमक झालेल्या कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या 3 पैकी एका घुमटाला घेराव घालून तोडण्यास सुरुवात केली होती.या घुमटाखाली सापडलेल्या सुमारे 25 कारसेवकांना इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी दुसरा घुमट तोडण्यात आला. 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त केली. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करून रामलल्लाची स्थापना केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram mandir and babri masjid, Supreme court verdict, Suprime court