उत्तर प्रदेश, 11 मार्च: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly election) भाजपचा (BJP) विजय झाला आहे. तर उत्तर प्रदेश निवडणुकीत यावेळी काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसला (Congress) उत्तर प्रदेशात इतिहासातील सर्वात दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. मात्र, हे नवीन नसून गेल्या अनेक निवडणुकांपासून पक्षाची कामगिरी ढासळत चालली आहे.
हाथरस प्रकरण, उन्नाव बलात्कार प्रकरण, लखीमपूर हिंसाचार आणि प्रियांका गांधी वड्रा यांची कोरोनाच्या काळात अतिक्रियाशीलता यानंतर पक्षाला कामगिरीत सुधारणा होईल अशी आशा होती, पण निराशा झाली आहे.
काँग्रेसच्या राज्यात केवळ जागांची संख्याच कमी झाली नाही, तर मतांच्या टक्केवारीतही मोठी घट झाली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 6.25 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर काँग्रेसनं समाजवादी पक्षासोबत आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी पक्ष एकला चलो रे या धोरणानुसार निवडणूक लढवत होता. पण जागांच्या बाबतीत किंवा मतांच्या बाबतीत काहीही फायदा झाला नाही. 2017 च्या 6.25 टक्के मतांच्या तुलनेत यावेळी पक्षाला केवळ 2.33 टक्के मते मिळाली.
1985 नंतर काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत
उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्थिती अचानक बिघडलेली नाही. गेल्या अनेक निवडणुकांपासून हा कल दिसून येत आहे. राज्यात दीर्घकाळ सत्तेत असलेला पक्ष हळूहळू विरोधी पक्ष बनला. आता आकडे बघितले तर यूपी निवडणुकीतही पक्षाची स्पर्धा नाही हे कळून येत आहे.
गेल्या वेळी 1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 269 जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यानंतर पक्षाला पन्नाशीचा आकडाही पार करता आलेला नाही. 1991 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 46, 1996 मध्ये 33, 2002 मध्ये 25, 2007 मध्ये 22, 2012 मध्ये 28 आणि 2017 च्या शेवटच्या निवडणुकीत 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं.
देशात फक्त छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार
काँग्रेसची अशी स्थिती केवळ उत्तर प्रदेशात नाही. पाच राज्यांचे निकाल गुरुवारी आले आणि पक्षाला कुठंही सन्मानाने कामगिरी करता आली नाही. पंजाबमध्ये गेल्या 5 वर्षांपासून सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसला अवघ्या काही वर्ष जुन्या आम आदमी पक्षाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्यातील 117 पैकी केवळ 18 जागा काँग्रेसला वाचवता आल्या असून आम आदमी पक्षानं 92 जागा जिंकल्या आहेत.
पुणे: राष्ट्रपती पदकासाठी हवालदारानं पोलीस दलालाच गंडवलं; कांड वाचून बसेल धक्का
देशात आता फक्त छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तामिळनाडू आणि झारखंडमध्ये त्याची सत्ताधारी पक्षाशी युती आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही सर्व काही ठीक नाही. येथे पक्षाला गटबाजीवर मात करायची आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात टीएस सिंह देव यांचा गट आहे, तर राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न याआधी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, Priyanka gandhi, Priyanka gandhi vadra, UP Election, Uttar pradesh news, काँग्रेस