नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी 2021) पहिल्या इंडिया टॉय फेअरचं (India Toy Fair 2021) आभासी पद्धतीने उद्घाटन (Virtual Inauguration) केलं. खेळण्यांचा हा पहिला उत्सव म्हणजे केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नव्हे, तर हा कार्यक्रम म्हणजे देशाच्या शेकडो वर्षं जुन्या असलेल्या खेळांच्या संस्कृतीचं मजबुतीकरण करण्याचा एक दुवा आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या वेळी केलं. सिंधू संस्कृती, तसंच हडप्पा आणि मोहेंजोदरो संस्कृतीच्या काळातल्या खेळण्यांवर जगभरात संशोधन झालं असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'प्राचीन काळी जेव्हा जगभरातले प्रवासी भारतात येत, तेव्हा ते भारतीय खेळ आत्मसात करत आणि आपल्यासोबत घेऊनही जात. आज जो शतरंज (बुद्धिबळ) (Chess) जगभरात लोकप्रिय आहे, तो आधी चतुरंग किंवा चादुरंगा नावाच्या रूपाने भारतात खेळला जात होता. आधुनिक युगातला लुडो (Ludo) तेव्हा 'पच्चिसी'च्या रूपात खेळला जात होता. आपल्या धर्मग्रंथांतही छोट्या रामाच्या वेगवेगळ्या खेळांचं वर्णन आढळतं.'
'पुनर्वापर (Reuse & Recycle) हा भारतीय जीवनशैलीचा पूर्वीपासूनच भाग आहे. तेच चित्र आपल्या खेळण्यांमध्येही दिसतं. बहुतांश भारतीय खेळणी नैसर्गिक आणि पर्यावरणाशी अनुकूल घटकांपासून तयार केली जातात. त्यात वापरले जाणारे रंगही नैसर्गिक आणि सुरक्षित असतात,' असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.
'देशातल्या खेळणी उत्पादकांनी अशी खेळणी बनवावीत, की जी इकॉलॉजी (पर्यावरण) (Ecology) आणि सायकॉलॉजी (मानसशास्त्र) (Psychology) या दोन्हींसाठी लाभदायक असतील,' असं आवाहन पंतप्रधानांनी देशातल्या खेळणी उत्पादकांना केलं. तसंच, खेळणी बनवताना प्लास्टिकचा (Plastic) वापर कमीत कमी करावा आणि रिसायकल अर्थात पुनर्वापर करता येण्यासारख्या घटकांपासून खेळणी बनवावीत, असं आवाहनही त्यांनी केलं.
'भारतीय खेळ (Indian Games) आणि खेळणी यांचं वैशिष्ट्य हे असतं, की त्यात ज्ञान, विज्ञान, मनोरंजन आणि मनोविज्ञान या सगळ्या बाबींचा समावेश असतो. भोवऱ्याचंच (Top) उदाहरण घ्या. भोवऱ्याशी खेळतानाच मुलांना गुरुत्वाकर्षण आणि संतुलन या दोन्हींचे धडे मिळतात. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (National Education Policy) खेळांवर आधारित, तसंच कृतींवर आधारित शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. प्रश्नमंजूषा, खेळ, स्पर्धा आदींच्या माध्यमातून मुलांची तार्किक विचारक्षमता (Logical Thinking), सर्जनशीलता (Creativity) वाढावी, अशी शिक्षण व्यवस्था विकसित होण्याच्या दृष्टीने हे धोरण तयार करण्यात आलं आहे,' असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
18 तासात 25 किमी डांबरी रस्ता पूर्ण; लिम्का बुकमध्ये नोंद आणि गडकरींकडून कौतुकही
'खेळण्यांच्या क्षेत्रात भारताकडे परंपरा आहे, तंत्रज्ञान आहे, संकल्पना आहेत, तसंच प्रतिस्पर्धीही आहेत. आपण जगाला पुन्हा पर्यावरणपूरक खेळण्यांच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. आपले सॉफ्टवेअर इंजिनीअर कम्प्युटर गेमच्या माध्यमातून भारतीय गोष्टी जगभर पोहोचवू शकतात,' अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
'खेळणी उद्योगाला आता देशातल्या प्रमुख 24 उद्योग क्षेत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय खेळणी कार्य योजनाही तयार करण्यात आली आहे. त्यात 15 मंत्रालयं आणि विभागांना सहभागी करण्यात आलं आहे. देश खेळण्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर (Atmanirbhar) बनावा, या उद्योगात स्पर्धा निर्माण व्हावी आणि देशातली खेळणी जगभर जावीत, हा त्यामागचा उद्देश आहे,' असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
31 मार्चआधीच पूर्ण करा Pan card संबंधित हे काम; नाहीतर बसेल मोठा फटका
'आज मेड इन इंडिया उत्पादनांची मागणी वाढली आहे. तसंच भारतात हाती तयार करण्यात आलेल्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. आज लोक खेळणी केवळ एक उत्पादन म्हणून खरेदी करत नाहीत, तर त्या खेळण्याची निगडित अनुभवांशीही जोडलं जाण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे हस्तनिर्मित (Handmade Products) वस्तूंच्या उत्पादनांनाही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे,' असं नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi