मुंबई, 24 मे : गायीचं तूप (Cow Ghee) हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त घटक आहे. आयुर्वेदानुसार गायीचं तूप आहारात असणं अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. तूप जितकं जुनं असले, तितकं ते अधिक गुणांनी युक्त असतं, असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी औषधासाठी घरात थोडं तूप विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवण्याची पद्धत होती. अनेक अस्सल आयुर्वेदिक औषधांसाठीही जुनं तूप साठवून ठेवलं जातं. राजस्थानात (Rajasthan) झुनझुनूमध्ये (Jhunjhunu) एका आश्रमात तब्बल 150 वर्षांपूर्वीचं तूप नुकतंच सापडलं आहे. एवढ्या वर्षांनंतरही त्या तुपाचा ताजेपणा आणि गंध अजिबात कमी झालेला नाही. एका कलशात ठेवलेलं हे 150 वर्षांपूर्वीचं तूप ( 150 Years old ghee) पाहण्यासाठी आता नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. 'झी न्यूज 'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
कुठे सापडलं तूप?
दीडशे वर्षांपूर्वीच्या या तुपाविषयी जाणून घेण्याआधी या आश्रमाच्या इतिहासाबद्दल थोडं जाणून घेऊ या. झुनझुनू मुख्यालयापासून चुरू रोडवर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर टांई गावात मन्नानाथ पंथीयांचा (Mannanath) एक आश्रम आहे. हे गाव बिसाऊच्या जवळ आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या आश्रमाचा इतिहास तब्बल 2000 वर्षं एवढा जुना आहे. तेव्हा राजा रशालू आपलं राज्य सोडून तिथे तपश्चर्येसाठी आला होता. बाबा गोरखनाथांनी राजाला सांगितलं होतं, की त्याचा घोडा जिथे जाऊन थांबेल, तिथे जाऊन तपस्या कर. त्यानंतर राजाने त्यानुसार अंमलबजावणी केली. त्याचा घोडा या ठिकाणी येऊन थांबला होता. त्यामुळे राजाने तिथेच तपस्या केली होती.
त्यानंतर गोरखनाथ आपल्या शिष्याचा सांभाळ करण्यासाठी टांई गावातल्या या तपस्यास्थळावर आले होते. तेव्हा राजा रशालू तपस्या करत होता. बाबा गोरखनाथांनी त्याला मन्नानाथ असं नाव दिलं. तेव्हापासूनच मन्नानाथ पंथ सुरू झाला.'
टांई या गावाचं नावही या मठाशीच निगडित आहे. असं ग्रामस्थ सांगतात. 'गोरखनाथांचे शिष्य रशालू यांनी आपली झोळी एका झाडाच्या सुकलेल्या फांदीवर टांगून ठेवली होती. तेव्हा ती सुकलेली फांदी पुन्हा हिरवीगार झाली होती. या गावात झाडाच्या फांदीला टांई असंही म्हणतात. त्यामुळेच या गावाला टांई असं नाव पडलं.
निसर्गाचा चमत्कार! डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात कबरीत सापडलं जिवंत
याच टांई गावातल्या नाथ आश्रमाचा जीर्णोद्धार (Renovation of Ashram) करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती ग्रामस्थ भवानीसिंह यांनी दिली. जेव्हा आश्रमाचा कळस काढण्यात आला, तेव्हा त्यात तुपाने भरलेला कलश सापडला. तो सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आला. त्या कलशातलं तूप एकदम ताज्या तुपासारखंच दिसत होतं. त्याचा सुगंधही ताज्या तुपासारखाच होता. पाहता पाहता ही बातमी गावभर पसरली आणि सर्वांनी तुपाचा हा कलश पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
आश्रमातले महंत सोमनाथ महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीर्णोद्धार झाल्यानंतर पुन्हा एकदा तुपाचा हा कलश त्याच ठिकाणी ठेवला जाणार आहे. ते सांगतात, की आश्रम उभारून जवळपास 150हून अधिक वर्षं झाली आहेत. आश्रम उभारतानाच तुपाचा हा कळस ठेवण्यात आला होता. म्हणजेच हे तूपही 150 वर्षांपूर्वीचं आहे. 'मी असं अनेकदा ऐकलं होतं, की गायीचं तूप बरीच वर्षं टिकतं, या वाक्याची प्रचीती आली आहे, ' असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science, Ghee, Rajasthan