मुंबई 14 मे : लोकसभेच्या निवडणुकांचा आता शेवटचा टप्पा सुरू आहे. सगळ्यांना 23 मे रोजी काय निकाल लागतील याची कमालीची उत्सुकता आहे. 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे तर 23 मे रोजी मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तरी त्याचं सरकार 13 दिवसही टिकणार नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.
शरद पवार म्हणाले, भाजपला या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली आणि मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरी त्यांचं सरकार फार काळ टिकणार नाही. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार जसं 1996मध्ये फक्त 13 दिवस टिकलं होतं तसच मोदींचं सरकारही फक्त 13 किंवा 15 दिवसच टिकेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.
पवार पुढे म्हणाले, लोकांना परिवर्तन पाहिजे आहे. भाजप आणि NDA विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष मिळूनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्व विरोधी पक्ष मिळून देशाला स्थिर सरकार देतील त्यांनी सांगितलं. विरोधी पक्ष एकत्र यायला सुरुवात झाली आहे. 21 मे नंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यातही सरकारच्या विरोधात भावना आहेत. तीव्र दृष्काळ असताना सरकार कुठल्याही उपाय योजना करत नाही अशी टीकाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीतही राज्यात परिवर्तन होईल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तिसगडमध्ये लोकांनी परिवर्तन केलं होतं. ती देशातल्या परिवर्तनाची सुरुवात आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lok sabha election 2019, Narendra modi, NDA, Sharad pawar, UPA