पियुष पाठक, प्रतिनिधी अलवर, 24 जुलै : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बीलेटा गाव मागील काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. अलीकडेच इथे खोदकामातून चांदीचे दगड आढळल्याचा दावा केला जात होता. त्यावरूनच याठिकाणी आणखी खनिजसाठा असण्याच्या शक्यतेतून खाण विभागाने खोदकाम सुरू केलं आहे. आता जमिनीच्या आतील खडकांवरून शिसे, जस्त, चांदी, इत्यादी खनिजांचा नेमका किती साठा आहे, हे तपासलं जाईल. याठिकाणी मोठ्याप्रमाणात शिसे, झिंक, चांदीसह इतर खनिजसाठा आढळण्याची शक्यता खाण विभागाने वर्तविली आहे. खनिज विभागाचे वरिष्ठ भूशास्त्रज्ज्ञ महेश शर्मा यांनी सांगितलं की, बिलेटा गावात 20 चौरस किलोमीटर परिसरात खनिजसाठा असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानंतर इथे खोदकाम सुरू करण्यात आलं. सुरुवातीला काळ्या खडकाचे अवशेष आढळले असून त्यातून शिसे, जस्त, चांदी आणि इतर खनिजे सापडत आहेत. दरम्यान, समुद्रात शून्य ऑक्सिजन स्थितीत असे साठे तयार होतात. त्यामुळे अलवरच्या बिलेटा गावात आढळणारी ही सर्वोत्तम ठेव मानली जात आहे.
अलवर शहरातील राज ऋषी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रामानंद यादव यांनी सर्वात आधी, बिलेटच्या डोंगराळ भागात दगडांमध्ये शिसे, चांदीसारखे मौल्यवान दगड बाहेर पडत असल्याचं उघड केलं होतं. त्यानंतर खाण विभागाच्या भूतज्ज्ञांनी घटनास्थळावरून या दगडाचे नमुने घेऊनचाचणीसाठी पाठवले होते. चाचणीतून हे दगड सामान्य दगडांच्या तुलनेत 7 पटीने वजनदार आणि चमकदार आढळले. त्यानंतर खाण विभागाकडून खोदकामाचा निर्णय घेण्यात आला.