उन्नाव, 15 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वीच दिल्लीत अपघाताची भीषण घटना घडली होती. यानंतर आता उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ‘हिट अँड रन’ची घटना घडल्याचं समोर आलं आहे. भरधाव वेगात असलेल्या एक्सयूव्ही कारनं रस्त्याच्या कडेला हातगाडी घेऊन चालत असलेल्या वृद्ध दाम्पत्याला धडक दिली आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की, हातगाडी पलटी होऊन वृद्ध दाम्पत्य रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालं आहे. जखमी दाम्पत्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हातगाडीला धडक दिल्यानंतर भरधाव वेगाने जाणारी कार घटनास्थळावरून निघून गेल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. उन्नाव सदर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात भारत पेट्रोल पंपासमोर पाणीपुरी विकण्याचं काम करणारे शिवलाल गौतम हे पत्नी कृष्णावती गौतमसोबत काम आटोपून घरी परतत होते. आदर्श नगर येथील रहिवासी असलेल्या या दाम्पत्याला मंगळवारी (7 फेब्रुवारी) रात्री काळ्या रंगाच्या एक्सयूव्ही-300 कारनं जोरदार धडक दिली. त्यात हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस अॅक्टिव्ह अपघातानंतर काही वेळातच स्थानिक लोकांची घटनास्थळी गर्दी जमा झाली होती. नागरिकांनी जखमी वृद्ध दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेला आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांचे हात अद्याप रिकामेच होते. मात्र, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. ही बातमी वेगाने पसरताच पोलिसांनी वाहन मालकाचा पुन्हा शोध सुरू केला.
हेही वाचा - 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिऊन दाखव, मित्रांनी दिलं आव्हान आणि घडलं भयानक हे वाहन भाजप नेते धनंजयसिंह चंदेल यांचं असल्याचं पोलिसांना समजलं आहे. चंदेल यांनी जखमी दाम्पत्याला आर्थिक मदत, उपचार व इतर मदतीचं लेखी आश्वासन दिलं आहे. पीडित दाम्पत्य आणि चंदेल यांनी सदर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये समोरासमोर हे प्रकरण मिटवलं आहे. बहुतेक वेळा स्वत:च्या किंवा कधी-कधी समोरच्या व्यक्तीच्या बेजाबदारपणामुळे अपघात होतात. रस्ता सुरक्षा हा विषय नेहमीच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं चिंतेचा राहिला आहे. जगभरात दरवर्षी सुमारे 10 लाख 35 हजार तर भारतात सुमारे दीड लाख लोक रस्त्यावरील अपघातांत मरण पावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात रस्ते अपघातांत जे 10 लाख 35 हजार बळी जातात, त्यापैकी एकट्या भारतात अंदाजे 11 टक्के मृत्यू होतात.

)







