नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Demolition Case) बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे.
कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा...देशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का? - ओवेसी
आजचा हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 'जय श्रीराम' अशी घोषणा देत आम्ही निकालाचं स्वागत केलं. निकालामुळे आम्ही अत्यंत आनंदी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया लालकृष्ण आडवाणी यांनी दिली आहे.
दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
हे होते बाबरी मशीद प्रकरणातील 32 आरोपी
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.
या 17 आरोपींचे झाले आहे निधन
सीबीआयने जाहीर केलेल्या 49 आरोपींपैकी 17 जणांचे निधन झाले आहे. यात अशोक सिंघल, गिरीराज किशोर, विष्णू हरी डालमिया, मोरेश्वर सवाईन, महंत अविद्यानाथ, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज, बैकुंठ लाल शर्मा, परमहंस रामचंद्र दास, डॉ सतीश. नगर, बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन एसएसपी डीबी राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह, लक्ष्मी नारायण दास, राम नारायण दास आणि विनोद कुमार बन्सल यांचे निधन झाले आहे.|
हेही वाचा: आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं?
अयोध्येत 6 डिसेंबर 1992 लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा होता.अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.