छत्तीसगड 04 एप्रिल : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत (Naxalite) झालेल्या चकमकीत (Sukma Encounter) पाच जवानांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, न्यूज 18 लोकमतच्या टीमनं घटनास्थळी जाऊन याबद्दलची सत्यता पडताळली आहे. प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत पाच नव्हे तर तब्बल 20 जवानांना वीरमरण आलं आहे. या घटनेला तब्बल 24 तास उलटून गेले आहेत. मात्र, तरीही जवानांचे मृतदेह अद्याप त्याचठिकाणी असून ते बाहेर काढण्यात आले नसल्याचंही समोर आलं आहे. घटनास्थळी जवानांच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पडल्याचं चित्र आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalite) चकमक झाली. या चकमकीत केवळ जवान शहीद झाले नाहीत. तर नक्षलवाद्यांना ठार करण्यातही यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीवेळी घटनास्थळी 200 हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. सुरक्षा दलाचा असा दावा आहे, की या चकमकीत पंधराहून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.
न्यूज 18 ची टीम सकाळी जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा दृश्य धक्कादायक होतं. टीमनं पाहिलं की, गावात नक्षलवादी उपस्थित होते आणि एका झाडाजवळ सहा जवानांचे मृतदेह होते. तिथूनच काही अंतरावर आणखी तीन जवानांचे मृतदेह आढळून आले. तर जवळच असलेल्या एका घराशेजारी आणखी एका जवानाचा मृतदेह होता. स्थानिक नागरिकांनी टीमला सांगितलं, की पुढे जंगलात आणखी दहा जवानांचे मृचदेह आहेत. सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात गावाच्या शेजारीच चकमक झाली होती. तर दुसरी चकमक जखमी जवानांना घेऊन जाताना झाली. नक्षलवाद्यांनी जखमी जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या टीमवर गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीदेखील गोळीबार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Naxal Attack