मुंबई, 07 जुलै: भाजपच्या (BJP) 12 आमदारांना निलंबित (12 MLA Suspension) केल्याप्रकरणी मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील राजकिय वातावरण तापताना दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित (Suspend) केलं आहे. ही कारवाई केल्यानंतर भाजपनं आगपाखड करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला असून राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. यानंतर आता हे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानी सागर बंगल्यात एकत्र जमले आहेत.
निलंबनाच्या कारवाईबाबत न्यायालयात जाण्याचा विचार संबंधित आमदार करत असून याची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात सुरू आहे. न्यायालयात धाव घ्यायची की विधानसभा अध्यक्षांची माफी मागून कारवाई मागं घ्यायला लावायची याबाबत रणनीती ठरण्यासाठी हे आमदार सागर बंगल्यात एकवटले आहेत. या बैठकीत प्रामुख्यानं न्यायालयात जाण्याबाबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत? न्यायालयात आपली बाजू कितपत टिकू शकेल आदी बाबींवर याठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्यातील अनेक नेत्याचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यात भाजप अशीच कठोर भूमिका घेणार की मवाळ धोरण स्विकारणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे.
हेही वाचा-'फडणवीसांच्या काळात 19 आमदारांचे निलंबन तेव्हा लोकशाहीची हत्या नाही वाटली'
सभागृहात घडलेल्या घडामोडीबाबत दखल देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यामुळे राज्यात भाजपची कोंडी होताना दिसत आहेत. त्यामुळे न्यायालयात जाऊन विरोधीपक्षाचा फारसा फायदा होईल, याची शक्यता फार कमी असल्याचं मत घटनातज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सभागृहात माफी मागितली आणि विधान सभा अध्यक्षांनी माफ केलं. तर निलंबनाची कारवाई मागे घेतली जावू शकते, असंही घटनातज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Mumbai