मुंबई, 07 जून : लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यास मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपचे नेते राम कदम यांनी उत्तर दिले आहे.
संजय राऊत यांचे लिखाण अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना अपयशी ठरली आहे. त्याचे पाप सोन सूदवर ढकलून लपवता येणार नाही, अशी टीका राम कदम यांनी केली.
1/1 स्वतःही करायचं नाही @SonuSood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका ? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?
— Ram Kadam (@ramkadam) June 7, 2020
जे काम महाराष्ट्र सरकारचे आहे. ते काम सरकारने केले नाही. सोनू सूद सारखा अभिनेता रस्त्यावर उतरून स्वत:च्या खिश्यातील पैसे खर्च करून गरिबांना मदत करत असले तर त्यावर टीका करणे ही संस्कृती आहे का? शिवसेनेचे नेते असे करणार आहे का? असा सवालही कदमांनी केला.
1/2 ..संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे ?मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या @rautsanjay61 @OfficeofUT @CMOMaharashtra
— Ram Kadam (@ramkadam) June 7, 2020
कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेला काय दिले. मुंबई रुग्णांना दोन दोन दिवस बेड मिळत नाही. सोनू सूदच्या कामाचे कौतुक करायला पाहिजे, उलट त्याच्यावर तुम्ही टीका करत आहात हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीकाही कदम यांनी केली.
काय म्हणाले होते राऊत?
दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रविवारच्या पुरवणीतील रोखठोक सदरात अभिनेता सोनू सूदवर सडकून टीका करत भाजपवर निशाणा साधला.
'सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. एक चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमांतून हे सर्व केले. ट्रस्टच्या माध्यमातून जमलेल्या पैशांतून मजुरांचा हा प्रवास खर्च उचलला असे सांगितले गेले. केरळच्या एर्नाकुलम येथे ओडिशाच्या 177 मुली अडकून पडल्या. त्यांना सूद महाशयांनी एका खास विमानाने भुवनेश्वरला पोहोचवले. विमानाची व्यवस्था होत नव्हती, तेव्हा बंगळुरूवरून एक खास विमान कोच्चीला आणले व तेथून या सर्व मुलींची रवानगी ओडिशाला केली. त्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोनू सूद आणि कंपनीचे आभार मानले आहेत. एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय?' असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.
हेही वाचा - 'कोरोना से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कोणाचा आहे?
'राज्याराज्यांची सरकारे या स्थितीत हतबल झालेली मी पाहिली. मजूर चालतच निघाले व लाखो मजूर बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन रखडले. त्यांना तेथे घोटभर पाणीही मिळत नव्हते. सोनू सूद त्या भुकेल्यांच्या खवळलेल्या गर्दीत पोहोचले नाहीत. हे लाखो लोक तेथे पोहोचले ते काय फक्त सोनू सूदने खास व्यवस्था केलेल्या बस, रेल्वेने? ‘‘कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल,’’ असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काही करत नाही, पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला' असा आरोपही राऊत यांनी केला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.