पुणे, 26 मे : राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी जाहीर केलं होतं. त्यासोबतच राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर शिवसेनेने सुद्धा या जागेवर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. त्यासोबतच संभाजीराजे यांना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली. पण संभाजीराजेंकडून कुठलीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले संभाजीराजे?
संभाजीराजे यांनी म्हटलं, सर्वप्रथम सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी केलं हे मी कदापी विसरु शकत नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय दिशा कशी असणार याबाबत 12 मे रोजी पुण्यात दोन निर्णय जाहीर घेतले. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार. पुण्यातील पत्रकारांनी पीसी ऐकल्यावर मला विचारलं हा भाभडेपणा नाहीये का? मी म्हटलं हो. मला सर्व गणितं माहिती आहेत. पुढील प्रवास किती खडतर आहे. मला सर्व पहायचं होतं. सर्व अनुभवायचं होतं. गेली 15 ते 20 वर्षे नवीन राजवाडा सोडून मी कम करत आहे. राज्यभर फिरतोय. प्रामाणिकपणे भूमिका मांडत होतो. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असं वाटत होतं.
संभाजीराजे यांनी पुढे म्हटलं, ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहील. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार. शिवसेनेने मला ऑफर दिली आणि पक्षात प्रवेश करण्याची खासदारकी मिळवा. मी घेऊ शकलो असतो पण मी जाहीर केलं होतं की, मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत. राजे.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडे बाजार होणार... घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाहीये. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.
वाचा : पुण्यात विद्यार्थीनीचे गुण ऐकून अजित पवारांनी अक्षरश: जोडले हात, पाहा VIDEO
राज्यसभा निवडणुकीतून माघार नाही तर..
या निवडणुकीच्या समोर मी जाणार नाही... पण ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
माझी ताकद 42 आमदार नाही तर...
संभाजीराजे यांनी पुढे म्हटलं, मी सर्व पक्षांना विनंती केली होती की, माझी कार्यपद्धती पाहून आपण सर्वांनी मला मदत करावी. माझी अजिबात कुणावरही नाराजी नाहीये. मी आता मोकळा झालोय स्वराज्य संघटीत करण्यासाठी. मला कोणत्याही पक्षाचा द्वेष नाही. मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे. माझी ताकद 42 आमदार नाहीत तर जनता आहे. आता स्वराज्य संघटना मजबूत करणार आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाटी सज्ज आहे.
सर्व अपक्ष आमदारांनी मला फोन केला आणि म्हटलं, राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत पण आमच्यावर दबाव आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Rajyasabha, Sambhajiraje chhatrapati