मुंबई, 20 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘शरद पवार यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 19 मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. भाजप कोरोनासंदर्भात महाराष्ट्र बचाव आंदोलन करणारा आहे. या आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी फडणवीस आणि इतर नेते मंडळींनीही भेट घेतली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरू आहे’, अशी टीकाही फडणवीस यांनी केली होती.
फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेत रोहित पवार यांनी ट्वीटकरून प्रत्युत्तर दिले आहे. ‘फडणवीसजी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल.’ असा सल्लाच रोहित पवारांनी फडणवीसांना दिला.
राहिला प्रश्न @PawarSpeaks साहेबांच्या पत्राचा. साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं.त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,असं मला वाटतं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2020
तसंच, ‘शरद पवार यांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो. याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,असं मला वाटतं’ असा सल्लावजा टोलाही रोहित पवारांनी लगावला. संपादन - सचिन साळवे