मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका परिसरात बलात्कार (Sakinaka Rape Case) झालेल्या पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू (victim died) झाला आहे. पीडित महिलेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपाचारादरम्यान पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारख्याच या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या पीडितेच्या मृत्यूनंतर विरोधी पक्षानेही आक्रमक होत आरोपींना फाशीच झाली पाहिजे असं म्हटलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटलं, साकीनाका येथे घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर त्या निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणारा आहे, चटका लावून जाणारा आहे. गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारे बलात्काराच्या घटना होत आहेत, कुठेतरी याकडे लक्ष घालण्याच्या आवश्यकता आहे. साकीनाकाचं प्रकरण, अमरावतीत 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्यात तीन घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये घटना घडल्या आहेत अतिशय भयानक अशा या घटना आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत महिला, मुलींना रात्री फिरण्या करता कधी अडचण येत नाही पण अशा प्रकारच्या घटना घडल्या जर घडल्या तर एकप्रकारे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो. मुंबईतील ‘निर्भया’चा मृत्यूनंतर चित्रा वाघ रडल्या, म्हणाल्या…‘‘सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना नाही वाचवू शकलो तुला’’ आमची मागणी आहे की, या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत सर्व आरोपी आहेत अशा सर्वांना अटक करावी. तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं आणि आरोपींना शिक्षा व्हावी. अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी चीफ जस्टीस ऑफ बॉम्बे हायकोर्टाची भेट घ्यावी आणि त्यांना विनंती करुन हा खटला लवकर चालवून संपला पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. महिला आयोगाच्या संदर्भात अनेकवेळा सरकारने आश्वासने दिली आहेत. न्यायालयाने देखील सरकारला सूचना केल्या आहेत पण सरकारला फुरसतच नाहीये की महिला आयोगाला ते अध्यक्ष देतील असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.