मुंबई 24, मे : पश्चिम बंगालमध्ये एक तरुणी आत्महत्या करण्याआधी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकते, ती पोस्ट मुंबई सायबर विभागाचे महानिरीक्षक यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या तरुणीचा पत्ता शोधून काढला जातो आणि वेळीच पोलीस तिच्या घरी पोहोचतात आणि तिचा जीव वाचवतात. एखाद्या सिनेमात शोभावी अशी घटना मुंबईत सायबर विभागात घडली आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला आहे.
घडलेली हकीकत अशी की, महाराष्ट्र सायबर विभाग हा 24 तास कोविड -19 संदर्भात सोशल मीडियावर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान त्यांना इन्स्टाग्रामवर एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट आढळून आली. ही बाब विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना कळताच, त्यांनी संभाव्य घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने पुढील पाऊल उचलले. सायबर सेल मधील तज्ज्ञांकडून संबंधित मुलीच्या अकाऊंटचे डिटेल्स तात्काळ शोधून काढले. ते पश्चिम बंगालमधील बराकपूर येथील आढळून आले.
हेही वाचा -उद्धव ठाकरे सरकारची केरळकडे मदतीची हाक; कोरोना रोखण्यासाठी केली ही विनंती
त्यांनी तातडीने बराकपूर सायबर सेलचे पोलीस अधिकारी सत्यजित मंडल यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीचा मोबाईल क्रमांक व सविस्तर माहिती देऊन संभाव्य घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बराकपूर पोलिसांनी तत्परतेने त्या मुलीचा शोध घेतला आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केलं.
या सर्व घटनेत संपर्कासाठी थोडा जरी अवधी लागला असता तरी मुलीचा जीव जाण्याची दुर्घटना घडली असती पण सुदैवाने योग्यवेळी संपर्क झाल्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला.
हेही वाचा -पियूष गोयल Vs उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचला, रेल्वेमंत्र्यांचं मध्यरात्री ट्वीट
याचे सर्व श्रेय हे महाराष्ट्र सायबर सेलमधील अधिकारी-कर्मचारी तंत्रज्ञ आणि अत्याधुनिक यंत्रणेला असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यादव यांनी म्हटलं आहे.