मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपने आपली खेळी खेळत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धोबीपछाड दिला आहे. भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आपले तिन्ही उमेदवार विजयी करुन दाखवले आहेत. तर महाविकास आघाडीचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, भाजपपेक्षा अधिक मते असतानाही शिवसेनेच्या (Shiv Sena) एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर मविआ सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) गोटात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारनंतर महाविच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, पक्षाची मते ही ठरलेल्या कोट्यानुसार मिळाली. पण लहान पक्ष आणि अपक्षांच्या मतांत गडबड झाली.
वाचा : महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ'; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
याविषयावर चिंतन करण्याची गरज आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी ही दुरुस्ती करणं आवश्यक आहे. निसटता पराभव झाला आहे. 10 मतांचा फरक पडला आहे. हा निकाल धक्कादायक आणि चिंताजनक आहे असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
वाचा : फडणवीसांची खेळी यशस्वी, अपक्षांची मतं फुटली; महाविकास आघाडीला धक्का
निसटता पराभव झाला आहे. भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावलं आहे. आता पुढील रणनिती असेल त्यानुसार आम्ही काम करु असंही गुलाबराव पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं आहे.
ठाकरे सरकार अस्थिर?
या निवडणूक निकालानंतर ठाकरे सरकार अस्थिर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, या निकालाचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅल्युलेशन पाहा ना... तुम्ही सर्व संख्या पाहिली तर सरकार चालवण्यासाठी जी संख्या आहे त्याच्यात काहीही धक्का नाही. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाहीये.
फडणवीसांचा चमत्कार पवारांनी केला मान्य
ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदरीत संख्येप्रमाणे मतदान झालं आहे. जो चमत्कार झालेला आहे तो मान्य केला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं विविध मार्गाने, त्या मार्गाने त्यांना यश आलं. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव असंही शरद पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.