मुंबई, 10 नोव्हेंबर : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कळकळीचे आवाहन करत आंदोलन मागे घ्या आणि सहकार्य करण्याचं म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका असंही विरोधकांना म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एसटीचे 376 कर्मचारी निलंबित 9 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील 45 डेपोतील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलनावर गेले आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच, हायकोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत. भाजपनेच ST कर्मचाऱ्यांना भडकवले : अनिल परबांचा आरोप विलगीकरण मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत रुजू व्हावे, असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. तसंच, भाजपनेच एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं, असा आरोपही परब यांनी केला आहे. ‘राज्य सरकारने प्रयत्न केले, त्यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आम्ही पालन केले जर कोणी कोर्टाचा अपमान करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावर विचार करू. विलगिकरण मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्या आहेत, हे काम 1-2 दिवसात होत नाही. त्यासाठी प्रक्रिया आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.