मुंबई 14 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. राज्यात पुरस्थिती असतानाही यात्रा सुरूच ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर विरोधपक्षांनी चौफेर टीका करत हल्लाबोल केला होता. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता भाजपने ही यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
यात्रेचा दुसऱ्या टप्पा ज्या ठिकाणावरून सुरू होणार आहे त्या ठिकाणच्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना महाजनादेश यात्रेचा दौरा प्राप्त झालाय. 22 ऑगस्ट रोजी धुळे येथून सकाळी महाजनादेश यात्रेला प्रारंभ आहे. अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता तर धरणगाव येथे 12.30 वाजता महाजनादेश यात्रा पोहोचणार आहे तर दुपारी 1.30 वाजता जळगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे व सायंकाळी पाच वाजता भुसावळात जाहीर सभा होणार आहे.
अमरावतीजवळच्या गुरुकुंज मोझरी इथून याच महिन्यात यात्रेला सुरूवात झाली होती. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली होती. त्यानंतर विदर्भात ही यात्रा फिरली. सभा, लोकांशी संवाद, पत्रकार परिषदा अशा माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचविणार आहेत.
पुरग्रस्तांच्या मदतीवरून उर्मिलाने 'बॉलिवूड'ला सुनावलं, म्हणाली...
खास रथाच्या माध्यमातून मुख्यमंत्री या यात्रेवर असून राज्यातल्या सर्वच भागात जाण्याचं त्यांचं नियोजन आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी प्रचाराचा एक टप्पा पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या आधी आदित्य ठाकरे यांनी जनआर्शीर्वाद यात्रा काढली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही यात्रांची घोषणा केलीय. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या यात्रेचं नेतृत्व करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis