मुंबई 13 सप्टेंबर: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच दुसरी चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे. रविवारी दिवसभरात तब्बल 416 जणांचा मृत्यू झला. आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या आहे. तर दिवसभरात 22 हजार 543 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10 लाख 60 हजार 308 एवढी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर हा 69.8 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर 2.79 एवढा आहे. 2 लाख 90 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट हे कायम आहे. हे संकट असताना राजकीय वादळ उठत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच, लोकल सेवा, रेस्टॉरंट सुरू करण्यात येईल, याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
COVID-19: मित्रांसोबत केली बेधुंद पार्टी, 9 लाखांचा दंड होताच नशाच उतरली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.
पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? दोन वेगवेगळ्या कोरोना रिपोर्टमुळे नागरिकांचं टेंशन वाढलं
आता सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून नक्की बोलेल. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus