मुंबई, 20 मार्च : कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षांसदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 1 ते 8वी पर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर 10वीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार असल्याचं शिक्षणमत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात आलं आहे. हे सर्व निर्णय राज्य बोर्डाच्या बाबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 31 मार्चपर्यंत राज्यात महत्त्वाचे बदल केले आहेत.
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
वाचा - मुंबई, पुणेकरांसाठी असे असतील निर्बंध; मुख्यमंत्र्यांच्या 10 महत्त्वाच्या घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या LIVE प्रसारणातील महत्त्वाचे मुद्दे
- सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.
- जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे.
- अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.
- काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे 15-20 दिवस अत्यंत -महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे
- काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.
- अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार
- तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता. बँका सुरूच राहतील.
- खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे.
- या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.
- ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. आज मुंबई आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील 4 शहरांसाठी मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद