मुंबई, 20 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.'
पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या. अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी 50 टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तसंच, बँका सुरूच राहतील. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात, असं आवाहनही त्यांनी केलं.
'ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका', अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.
आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. यातून काही गोष्टी तुम्हाला खुपतील पण काही बदल करावे लागतील. बस आणि लोकल मुंबईचा श्वास आहे. पण बस आणि रेल्वे बंद होणार नाहीत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.