मुंबई, 25 मे: महाराष्ट्रात कोरोनाचा आता गुणाकार सुरू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात काल, रविवारी नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली आहे.
हेही वाचा.. पियूष गोयल Vs उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचला, रेल्वेमंत्र्यांचं मध्यरात्री ट्वीट
राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली आहे. राज्य सरकारने केरळकडे 150 डॉक्टर आणि परिचारिका पुरवण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केरळ सरकारने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबईत नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या हॉस्पिटलची जबाबदारी केरळचे डॉक्टर आणि परिचारिका सांभाळणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवरील केंद्राची जबाबदारी केरळकडे सोपवण्यात येणार आहे. रेसकोर्सवर 600 खाटांचे विशेष कोव्हिड हॉस्पिटल तयार होत आहे. तिथे तब्बल 125 खाटांचा ICU वॉर्ड असणार आहे.
केरळहून येणाऱ्या एमडी अथवा एमएस डॉक्टरांना 2 लाख, एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार आणि परिचारिकांना 30 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा.. नाशिक कनेक्शन! योगी आदित्यनाथ धमकीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात रविवारी दिवसभरात 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दुसरीकडे, देशात 24 तासांत 6977 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.