नवी दिल्ली, 23 ऑगस्ट: घर घ्यायचंय, कार घ्यायची असेल किंवा अन्य कोणताही मोठा खर्च आल्यास अशा वेळी विचार केला जातो तो कर्जाचा (Bank Loan). कर्ज घेण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. सगळ्या बँकांतील व्याज दर बघावे लागतात. आपल्या पगारातून किती हप्ता कर्जफेडीसाठी भरावा लागेल. त्यानंतर घरखर्चाला किती रक्कम हातात राहील याचा विचार करूनच मग कर्जप्रकरण करावं लागतं. त्यातही परत जामिनदार लागतो. सध्या कर्ज सहज उपलब्ध होतात पण व्याज दर खूप असतो. पण आपण कर्ज घेऊन आपली गरज भागवतो. त्यानंतर शिस्तीत कर्जाचे हप्तेही (EMI) भरतो. एकदा का कर्ज पूर्ण फेडलं गेलं की आपलं काम संपलं असं वाटून आपण निर्धास्त होतो. पण कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC ) घेणं गरजेचं आहे. या प्रमाणपत्रावरून हे सिद्ध होतं की, तुम्ही कर्ज परत (Loan Return) केलं आहे आणि आपल्याकडे बँक किंवा वित्तीय संस्थेकडे कोणतेही कर्ज नाही.
कर्ज घेतल्यानंतर त्याचे ईएमआय वेळेवर भरून कर्जाची सर्व रक्कम तुम्ही वेळेवर भरता पण कर्जाची परतफेड केल्यानंतर आपली जबाबदारी (Responsibility) संपली का, याचे उत्तर होय असे तुम्हाला वाटेल. पण या क्षेत्रातील तज्ज्ञांचे यावर वेगळे मत आहे. त्यांच्या मते, कर्जाची वेळेवर परतफेड करणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु कर्जाचे पैसे परत केल्यावरच सर्वात मोठी जबाबदारी येते, ती म्हणजे आता कोणतंही कर्ज बाकी नाही, असे बँकेकडून लेखी घेण्याची. याचाच अर्थ बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) अर्थात एनओसी घेण्याची. कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेला कर्ज फेडणाऱ्या व्यक्तीला एक प्रमाणपत्र द्यावं लागते. या प्रमाणपत्राला एनओसी म्हणतात.
जेव्हा एनओसी हातात येईल, तेव्हाच कर्जदार हा पूर्णपणे कर्जातून मुक्त होतो. हे प्रमाणपत्र केवळ कागदाचा तुकडा नसून एक कायदेशीर दस्तऐवज आहे. एनओसी घेतल्यानंतर आपण कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित होतो. कारण नंतर बँकेकडून कर्जासाठी तुमच्यावर कोणताही दावा केला जाणार नाही. जरी बँकेने दावा करीत फसवणूक केली, तर एनओसीच्या आधारे बँकेला न्यायालयात खेचता येऊ शकते.
Alert! तुम्हाला PAN Card संबंधी असा मेसेज आला का? वेळीच व्हा सावध, अन्यथा मोठं नुकसान
कर्ज फेडल्यानंतर जर एनओसी घेतली नसेल, आणि बँकने पुन्हा कर्जाची मागणी करून तुमच्यावर खटला भरला तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. या परिस्थितीत तुमच्याकडे कोणताही कायदेशीर आधार नसतो. न्यायालयामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडल्यानंतर न्यायालय बँकेला एनओसी देण्यास सांगू शकतं. परंतु जोपर्यंत तुम्हाला एनओसी मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक त्रासातून जावं लागू शकतं.
बँकेत लॉकर घेतला आहे का? ही चूक करू नका, अन्यथा...
कर्जाची परतफेड केल्यानंतर तातडीने सिबिलला (CIBIL) माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्जाची परतफेड केल्याची एनओसी बँकेकडून प्राप्त झाल्याचं त्यांना सांगा. एनओसी घेतली नाही, सिबिल यांना कळवले नाही, तर त्यांच्या रेकॉर्डमध्ये तुमची डिफॉल्टर म्हणजे कर्जबुडवे म्हणून नोंद होऊ शकते, त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला कर्ज घेताना अनेक अडचणींमधून जावं लागू शकतं.
भविष्यात कर्जाची शिल्लक हस्तांतरित करायची असेल तर त्यासाठी एनओसी हा सर्वांत महत्वाचा कागद आहे. एनओसीशिवाय कर्ज शिल्लक हस्तांतरित करता येत नाही. जर कर्ज एका बँकेकडून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करायचे असेल तर त्यासाठी एनओसी आवश्यक आहे. जोपर्यंत एनओसी मिळणार नाही, तोपर्यंत बँक कर्ज हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करणार नाही.
अशाप्रकारे कर्ज फेडल्यानंतर प्रमाणपत्र मिळेपर्यंत तुमची जबाबदारी आहे. ती पार पाडा आणि व्हा निवांत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Loan