पुणे, 06 जानेवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॉन-बँकिंग वित्तीय सेवा देणारी कंपनी बजाज फायनान्स (NBFC Bajaj Finance) वर अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कंपनीबाबत ग्राहकांकडून रिकव्हरी आणि कलेक्शनसाठी (Recovery & Collection Methods) चुकीच्या पद्धतींचा वारंवार तक्रारी येत होत्या. इतकेच नाही तर कंपनीच्या विरोधातही फेअर प्रॅक्टिस कोड (FPC) चे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अशा परिस्थितीत नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड लावण्यात आला आहे.
ग्राहकांना त्रास झाला नाही हे कंपनी सिद्ध करू शकली नाही
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेच्या सूचनांचे बजाज फायनान्स, पुणे यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे RBI ने म्हटले आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने सर्व एनबीएफसींसाठी लागू केलेल्या फेअर प्रॅक्टिस कोडकडे देखील दुर्लक्ष केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 (RBI Act) अंतर्गत ही कारवाई केली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कंपनी हे सुनिश्चित करू शकली नाही की, त्यांच्या रिकव्हरी एजंटकडून वसुलीवेळी ग्राहकांना त्रास सहन करावा लागला नाही.
(हे वाचा-नवीन वर्षात खरेदी करा स्वत:चं आणि स्वस्त घर! ही बँक देते आहे संधी)
आरबीआयने हा दंड आकारण्यापूर्वी बजाज फायनान्सला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. नियमांचे उल्लंघन झाल्यास कंपनीवर दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसमधून करण्यात आली होती. यास उत्तर दिल्यानंतर केंद्रीय बँकेने कंपनीला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने सांगितले की ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे. तसेच या कारवाईचा कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा कराराच्या वैधतेवर शंका घेण्याचा कोणताही हेतू नाही, असेही म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money