प्रियांका बोबडे, प्रतिनिधी
अहमदनगर, 6 मार्च: भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक वेगवेगळे पीक घेतले जातात. भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत. अहमदनगरमधील प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ यांनी असाच एक प्रयोग केला आहे. नेवासा तालुक्यातील रामडोह या गावात चक्क हिमालयातील सफरचंदाची शेती केली आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून झाडांना फळे देखील लागलेली आहेत.
हिमाचल प्रदेशातून आणली रोपे
भारत गुंजाळ यांनी लागवड केलेल्या सफरचंदाला 27 महिने पूर्ण झाले आहेत. त्यांनी सफरचंद पिकाची रोपे हिमाचल प्रदेश मधून मागवली आहेत. साधारण तीन महिन्यांची रोपे त्यांनी मागवली आणि आपल्या एक एकर जमिनीत त्याची लागवड केली. हिमाचलमधून रोपे आणण्यासाठी त्यांना प्रति रोप 125 रुपये एवढा खर्च आला. त्यांनी आपल्या शेतात 375 सफरचंदाची रोप लावली आहेत.
अडीच वर्षांनी फलधारणेस सुरुवात
लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये संफरचंदाच्या झाडांना फळे लागली आहेत. सध्या एका झाडाला 70 ते 75 फळे आले आहेत. त्यामुळे आता फळांचे उन्ह आणि पक्षांनी नुकसान करू नये म्हणून त्यांना प्लास्टिक आच्छादन करण्याचे काम सुरू केले आहे.
सफरचंदासाठी थंड हवामान आवश्यक
सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान अतिशय पूरक आहे. सफरचंद पिकाला 100 दिवस थंडावा हवा असतो. यासोबतच ज्या ठिकाणी 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि जेथे पर्वतांची उंची 1600 ते 2700 मीटर इतकी आहे, अशा ठिकाणी या पिकाची शेती प्रामुख्याने केली जाते.
Ahmednagar News : मोत्यासारखी ज्वारी खरेदी करायचीय? 'इथं' संपेल शोध, Video
महाराष्ट्रातही सफरचंदाची शेती
अलीकडे सफरचंदाच्या अशा काही जाती विकसित झाल्या आहेत ज्या इतर मैदानी प्रदेशात देखील यशस्वीरित्या उत्पादित केल्या जात आहेत. यामुळे केवळ पर्वतीय प्रदेशात आणि थंड हवामान असलेल्या भागात उत्पादित होणार सफरचंद अलीकडे महाराष्ट्रात देखील दिसू लागल आहे. बदलत्या काळानुसार सफरचंदाचे काही वाण हे 50 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानातही जगू शकतात. या फळाला चिकट आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त आहे. सफरचंदाच्या पिकाला हवी असणारी जमीन मिळाली तर पिक जोमात येते.
जायकवाडी धरण क्षेत्रातील वातावरणाचा फायदा
अहमदनगरमधील ज्या भागात हे पीक घेतले जात आहे, तिथे वातावरण काही अंशी थंडच जाणवते. कारण जायकवाडीच्या बॅक वॉटर हा पट्टा आहे. त्यामुळे येथील वातावरणात गारवा असतो. येथील तापमान कमीत कमी 15° आणि जास्तीत जास्त 30° आहे. सफरचंदाची लागवड करण्यासाठी सरासरी तापमान 21 ते 24 अंश असणे गरजेचे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे 100 ते 125 सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे.
Success Story: पारंपरिक शेतीला फाटा, औषधी पिंपळीच्या शेतीतून मिळवला लाखोंचा नफा, Video
प्रायोगिक तत्त्वावर सफरचंदाची लागवड
भारत गुंजाळ यांनी जोखीम पत्करत आपल्या एक एकर शेत जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद शेती सुरू केली. जायकवाडीच्या कुशीत वसलेल्या रामडोह येथे सफरचंद लागवड शक्य असल्याचे या प्रयोगातून समोर आले आहे. आता गुंजाळ यांचा हा नवखा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Ahmednagar, Ahmednagar News, Local18, Success story