विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 26 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आपल्या मालाला हमीभावाची मागणी करत आहेत. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सध्याच्या स्थितीला कांद्याला कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे कांद्याने सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कांद्याची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्च देखील भरून निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरवर्षी अशीच परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय? असा भावूक सवाल नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी मधुकर विठोबा सानप यांनी आपल्या शेतात चार एकर कांदा लावला आहे. त्यातील एक एकर कांदा काढून त्यांनी नाशिक बाजारपेठेत कवडीमोल भावात अवघ्या दोन ते तीन रुपयांनी कांद्याची विक्री केली आहे. त्यांना 60 क्विंटल कांदे विकून अवघे 18 हजार रुपये मिळाले.
Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल वाढले, मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र, Video
35 हजार रुपये तोटा झाला कांदा पिकवण्यासाठी मजुरी, बियाणं, औषध, फवारणी सर्व खर्च मिळून 50 हजार रुपये खर्च येतो. त्यात माल काढल्यानंतर तो बाजारपेठेत नेईपर्यंत एका क्विंटल मागे साधारण 50 रुपये खर्च येतो. वडगाव ते नाशिक बाजारपेठ साधारण 25 ते 26 किलोमीटर अंतर आहे. एका क्विंटलच भाडं 40 रुपये आहे. आणि हमाली दहा रुपये म्हणजे एकूण 50 रुपये खर्च येतो. असा ट्रान्सपोर्टचा खर्च त्यांचा 3 हजार रुपये झाला. 18 हजार रुपयांमधून 3 हजार रुपये गेल्यानंतर उरले 15 हजार रुपये ते 15 हजार रुपये मी इतरांकडून घेतलेले. औषध बियाणं किंवा इतर जो खर्च होता तो वाटून दिला. सध्या माझ्या हातात एकही रुपया शिल्लक राहिला नाही. उलट झालेल्या खर्चात 35 हजार रुपये तोटा झाला आहे, असं मधुकर सानप यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी काय करायचं ? मला चार मुली आहेत त्यांचा शाळेचा खर्च, इतर खर्च, यामुळे घर कस चालवायचं? आता उरलेले कांदे काढत आहोत. कारण या कांद्याची साठवणूक करू शकत नाही काही दिवसातच ते खराब होतात. त्यामुळे हे कांदे देखील कवडीमोल भावात विकावा लागणार आहेत. अशी जर परिस्थिती असेलतर शेतकऱ्यांनी काय करायचं ? असा भावूक सवाल सानप यांनी उपस्थित केला.
सरकारने हमीभाव द्यावा गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हमीभावाची मागणी करत आहे. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांना शब्द दिला की लवकरच तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू मात्र अद्यापही सरकारने या विषयावर तोडगा काढलेला नाही. सध्या निर्यात बंद असल्यामुळे कांद्याची आवक वाढून देखील कांदा पडून आहे, असं शेतकरी सिंधूबाई सानप यांनी सांगितले.

)







