अहमदनगर, 11 जुलै : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. स्वयंपाकघरातून टोमॅटो हद्दपार झालाय. त्याचबरोबर अनेक हॉटेलमधून टोमॅटोचे पदार्थ बंद झाले आहेत. टोमॅटोच्या महागाईनं सर्वसामान्य त्रस्त असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील एका गावानं नवा आदर्श निर्माण केलाय. साततत्याने दुष्काळाशी दोन हात करणारं संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा हे गाव टोमॅटोचं आगार म्हणून प्रसिद्ध झालंय. या शेतकऱ्यानं परिसरातील दोनशे हेक्टर जमिनीवर टोमॅटोची लागवड केलीय. कसा झाला बदल? पिंपळगाव देपा गावांतर्गत खंडेरायवाडी, मोधळवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या भागातल्या शेतकऱ्यांना सातत्यानं दुष्काळाचा सामना करावा लागतो. सिंचनाची समस्या मिटावी म्हणून गावकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली. पावसाळ्यात शेतकरी शेततळे भरुन ठेवत. या माध्यमातून त्यांनी दरवर्षाी टोमॅटोची लागवड सुरू केली.
या वर्षी शेतकऱ्यांनी दोनशे हेक्टरवरील क्षेत्रात मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र टोमॅटोचे फड पाहायला मिळत आहेत. पाण्याची कमतरता असतानाही येथील शेतकऱ्यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ही किमया साधली आहे. डॉलरपेक्षा महाग झाला टोमॅटो, पण शेतकऱ्यांच्या पदरात किती पडले पैसे? धक्कादायक वास्तव समोर ‘आजही पिंपळगाव देपा परिसराला मोठ्या पावसाची गरज आहे. शेततळ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक नाही. या बिकट परिस्थितीतही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट उत्तमरित्या फुलवले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला पिण्याचे पाणी टँकरनं द्यावं लागतं. सध्याही या गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. त्यानंतरही शेततळ्याच्या माध्यमातून हे गाव टोमॅटोचं आगार बनलं आहे. पिंपळगाव देपा गावासह खंडेरायवाडी, मोधळवाडी या भागातील शेतकरी दर वर्षी टोमॅटोची लागवड करतात,’ अशी माहिती पिंपळगावचे कृषी सहायक संकेत देशमुख यांनी दिलीय. आमच्या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे टोमॅटोचे आहे. त्यावरच सर्व आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे दर वर्षी येथील शेतकरी हे पीक घेतात. यंदाही टोमॅटोचं चांगलं पिक येईल अशी आशा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.